ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांना नंतर त्रास झाला, त्यांच्या मृत्यूची शक्यता ३ पटींनी वाढली !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन

नवी देहली – कोरोनातून बरे झालेल्या ज्या रुग्णांना कोरोनानंतरचा (पोस्ट कोविडचा) त्रास झाला, त्यांच्या मृत्यूची शक्यता ३ पटींनी वाढली आहे, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (‘आय.सी.एम्.आर्.’ने) काढला आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या ६.५ टक्के मध्यम ते गंभीर रुग्णांचा वर्षभरात मृत्यू झाल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘ज्यांना अल्प स्वरूपाचा संसर्ग झाला होता, त्यांना हा निष्कर्ष लागू होणार नाही’, असे आय.सी.एम्.आर्.शी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. ३१ रुग्णालयांमधील १४ सहस्र ४१९ रुग्णांच्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

१. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांना वर्षभरात मृत्यूचा धोका अधिक होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला होता, त्यांचा मृत्यूचा धोका ४० टक्क्यांनी अल्प झाला होता.

२. आय.सी.एम्.आर्.च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांमध्ये कोविडमुळे मृत्यूचा धोका संभवतो. याचा अर्थ यकृत आणि मूत्रपिंड यांच्याशी संबंधित आजाराच्या लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

३. कोरोनाच्या संसर्गामुळे दीर्घकाळ जळजळ, अनेक अवयव निकामी होणे, फुफ्फुसाचे बिघडलेले कार्य यांमुळे हे मृत्यू झाले असावेत, असेही या संशोधनात म्हटले आहे.