आळंदीच्‍या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्‍यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, सभापती, विधान परिषद

आळंदी येथील इंद्रायणी नदीचा घाट परिसर

आळंदी (जिल्‍हा पुणे) – आळंदीचा विकास होण्‍यासाठी ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्‍यक आहे. सिद्धबेट, दर्शनबारी आणि इंद्रायणी प्रदूषणाविषयी सरकारचे लक्ष वेधू. आगामी काळात सरकार आणि प्रशासकीय पातळीवर बैठक घेऊ, असे आश्‍वासन विधान परिषदेच्‍या सभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी दिले. त्‍या अधिक मास आणि श्रावण मास यांच्‍या निमित्ताने आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्‍यासाठी आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी त्‍यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

नीलम गोर्‍हे यांनी पुढे सांगितले की, आळंदीतील इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणाविषयी राज्‍य सरकारचे लक्ष आहे. तरी येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्‍याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्‍य सरकारने चालू केले पाहिजे. प्रदूषण रोखण्‍यासाठी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे.

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ने २६ जुलै या दिवशी ‘विशेष वार्तापत्र’ प्रसिद्ध केले होते. इंद्रायणी नदीचे प्रदूषण, मंदिरातील व्‍यवस्‍था, पाण्‍यावर वाढलेली जलपर्णी, गावातील अस्‍वच्‍छता आणि सरकारची अनास्‍था यांविषयी आवाज उठवला होता.