बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप

इस्लामपूर (बंगाल) – येथे असीम साहा नावाच्या भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. साहा हे कपड्यांचे व्यापारी होते. साहा यांच्या दुकानात घुसून आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांची हत्या केली. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे भारतीय जनता युवा मोर्चाने येथे १२ घंट्यांच्या बंदच आवाहन केले होते.

उत्तर दिनाजपूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरजीत सेन यांनी आरोप केला की, असीम साहा यांच्याकठा तृणमूल काँग्रेसचे गुंड हप्ता मागत होते. साहा यांनी हप्ता देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली. येथे तृणमूलच्या गुंडांना हप्ता दिल्याविना कुणीच व्यवसाय करू शकत नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आज साहा यांच्या संदर्भात ही घटना घडली, उद्या आणखी कुणासमवेतही ती घडू शकते.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची प्रतिदिन लक्तरे निघत असतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र निष्क्रीय आहेत. केंद्र सरकारने राज्यातील ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावणे अपेक्षित आहे, असे जनतेला वाटते !