भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्‍ये मतदान करू ! – अजितसिंह बग्‍गा, राष्‍ट्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, व्‍यापार मंडळ आणि अध्‍यक्ष, वाराणसी व्‍यापार मंडळ

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘राष्‍ट्र आणि धर्म रक्षणासाठी केलेला संघर्ष’ या विषयावर मान्‍यवरांनी केलेले तेजस्‍वी मार्गदर्शन

श्री. अजितसिंह बग्‍गा

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – औरंगजेबाने हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्‍या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्‍थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्‍यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही पुनर्स्‍थापित केल्‍याविना आम्‍ही रहाणार नाही. आपल्‍या भावी पिढीला आपण राष्‍ट्राभिमान आणि हिंदु धर्म यांची शिकवण द्यायला हवी. भारतात रहायचे असेल, तर ‘भारत माता की जय’ म्‍हणावेच लागेल. भारताला हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी प्रत्‍येक हिंदुत्‍वनिष्‍ठाने स्‍वत:च्‍या क्षेत्रात जनजागृती करायला हवी. त्‍यासाठी वेळ द्यायला हवा. असे केल्‍यामुळेच सर्व हिंदूंमध्‍ये हिंदु राष्‍ट्राची भावना निर्माण होईल. हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी आपल्‍या रक्‍तामध्‍ये हिंदुत्‍व असायला हवे. जो राजकीय पक्ष भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करील, त्‍या पक्षालाच वर्ष २०२४ मध्‍ये मतदान करू, हे हिंदूंनी ठरवावे, असे उद़्‍गार व्‍यापार मंडळाचे राष्‍ट्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष आणि वाराणसी व्‍यापार मंडळाचे अध्‍यक्ष अजितसिंह बग्‍गा यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत पार पडलेले वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘राष्‍ट्र आणि धर्म रक्षणासाठी केलेला संघर्ष’ या विषयावर बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक झारखंड येथील पू. प्रदीप खेमका, नवी देहली येथील ‘महाराष्‍ट्र शैक्षणिक आणि सांस्‍कृतिक संस्‍थे’चे अध्‍यक्ष अधिवक्‍ता मकरंद आडकर आणि कछार (आसाम) येथील ‘हिंदु जागरण मंचा’चे जिल्‍हाध्‍यक्ष अधिवक्‍ता राजीव नाथ उपस्‍थित होते.


प्रत्‍येकाने आपापल्‍या क्षेत्रात कार्यरत राहून साधना करावी ! – पू. प्रदीप खेमका, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था, झारखंड

पू. प्रदीप खेमका

कोरोना महामारीच्‍या काळात लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण होते, त्‍याच वेळी माझे व्‍यवसाय व्‍यवस्‍थित चालत होते. ‘माझा व्‍यापार गुरुदेवांचा आहे’, असा माझा भाव आहे. साधना मी स्‍वत:साठी करत आहे, हा भाग लक्षात घेऊन मी साधनेचे सातत्‍याने प्रयत्न करत आहे. माझ्‍या कोणत्‍याही कर्मचार्‍याला कोरोना महामारीची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्‍ये खरोखर शक्‍ती असल्‍याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे. आपण करत असलेली साधना स्‍वत:सह कुटुंब, उद्योग आणि आपले कार्यक्षेत्र या सर्वांना सुरक्षित ठेवते. माझ्‍या २ कर्मचार्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी  नामजप, सत्‍संग, सत्‍सेवा, सत्‌साठी त्‍याग करणे, स्‍वत:मधील स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करणे, सतत ईश्‍वराच्‍या अनुसंधानात रहाणे, हे साधनेचे प्रयत्न आचरणात आणावेत. प्रत्‍येकाने आपापल्‍या क्षेत्रात कार्य करावे; परंतु त्‍यासह साधना करावी.


समलैंगिकतेला मान्‍यता दिल्‍यास भारतातील अनेक कायद्यांवर दुष्‍परिणाम होईल ! – अधिवक्‍ता मकरंद आडकर, अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र शैक्षणिक आणि सांस्‍कृतिक संस्‍था, नवी देहली

अधिवक्‍ता मकरंद आडकर

सर्वोच्‍च न्‍यायालयात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्‍यता देण्‍यासाठी १५ याचिका प्रविष्‍ट झाल्‍या आहेत. या याचिकांमध्‍ये हिंदु विवाह कायदा रहित करणे, २ पुरुष किंवा २ स्‍त्रिया यांनी एकमेकांशी केलेले समलिंगी विवाह कायदेशीर करणे आदी मागण्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. देश अनेक समस्‍यांनी होरपळत असतांना समलैंगिकतेला मान्‍यता द्यावी कि नाही ? यावर सर्वोच्‍च न्‍यायालयात १५ दिवस सुनावणी झाली. देशात समलैंगिकता आणि त्‍यांचा विवाह यांना मान्‍यता दिल्‍यास हिंदु विवाह कायद्याचे काय करणार ? पोटगी कुणाला देणार ? महिलांना सरंक्षण देणार्‍या घरगुती अत्‍याचार प्रतिबंधक कायद्याचे काय करणार ? पत्नीवर अत्‍याचार झाल्‍यास पत्नी म्‍हणून कुणाला न्‍याय मिळणार ? असे अनेक प्रश्‍न आहेत. त्‍यामुळे समलैंगिकतेला मान्‍यता दिल्‍यास अशा प्रकारे भारतातील अनेक कायदे बाधित होतील. ‘समलैंगिकतेला मान्‍यता मिळाली नाही, तर देशाची मोठी हानी होईल’, असे न्‍यायालयाला वाटत असेल, तर न्‍यायालय तसे संसदेला सांगू शकते; मात्र अशा प्रकारचा कायदा करण्‍याचा अधिकार न्‍यायालयाला नाही. समलैंगिकता ही आपली संस्‍कृती नसल्‍याचे प्रतिज्ञापत्र केंद्रशासनाने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केले आहे. अन्‍य देशांत काय होते, यापेक्षा भारतीय संस्‍कृती याला मान्‍यता देत नाही, हे आपण समजून घ्‍यायला हवे.


उत्तर-पूर्व भारतात हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक ! – अधिवक्‍ता राजीव नाथ, जिल्‍हाध्‍यक्ष, हिंदु जागरण मंच, कछार, आसाम

अधिवक्‍ता राजीव नाथ

केवळ श्रीराममंदिराचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्‍न आहेत आणि प्रत्‍येक प्रश्‍न सोडवण्‍यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्‍यामुळे ‘सर्व प्रश्‍नांवर उपाय मिळवण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करणे’, हाच उपाय आहे.

आसाममध्‍ये ब्रिटिशांच्‍या काळापासून ख्रिस्‍ती पंथियांचे प्रमाण अधिक आहे. ज्‍या ज्‍या ठिकाणी त्‍यांची संख्‍या वाढली, तेथे देश विभागला गेला आहे. आसाममध्‍ये मुसलमान लोकसंख्‍याही ३६ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. तसेच ९ जिल्‍हे मुसलमानबहुल बनले आहेत. त्‍यामुळे आसामकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. केवळ आसामच नाही, तर संपूर्ण उत्तर-पूर्व भारतामध्‍ये हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. आसाममध्‍ये धर्मांधांकडून सुनियोजितपणे ‘लव्‍ह जिहाद’ राबवला जातो. त्‍यांच्‍याकडून १८ वर्षांवरील मुलींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढण्‍यात येते. त्‍यासाठी ते वशीकरणाचाही वापर करतात. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’ मध्‍ये अडकलेल्‍या मुलींना सोडवण्‍यासाठी बुद्धीकौशल्‍यासमवेत आध्‍यात्मिक स्‍वरूपाच्‍या नामजपासारख्‍या उपायांचाही पुष्‍कळ लाभ होतो. आसाममध्‍ये ‘लँड (भूमी) जिहाद’चीही मोठी समस्‍या आहे; पण तेथे आता हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार असल्‍यामुळे हा प्रश्‍न सुटण्‍यासाठी साहाय्‍य होत आहे.’’