छत्रपती संभाजीनगर शहराच्‍या नामांतरास ७५ वर्षे लागली, हे दुर्दैव ! – भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी

डॉ. सुधांशू त्रिवेदी

छत्रपती संभाजीनगर – या देशाच्‍या संस्‍कृतीवर आक्रमण केले, अनन्‍वित अत्‍याचार केले, त्‍या औरंगजेबाचे नाव या शहराला दिले. त्‍या काळात देशात सर्वांत मोठे सैन्‍य असलेल्‍या मोगलांना महाराष्‍ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍याने आव्‍हान दिले. त्‍याच राज्‍यात देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतरही शहराचे नाव पालटण्‍यासाठी ७५ वर्षे लागली, हे दुर्दैवी आहे. देश स्‍वाभिमानाने उभा रहातो आहे, तेव्‍हाच हे शक्‍य होते. त्‍यामुळेच ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ झाले, ‘राजपथ’ पालटून ‘कर्तव्‍यपथ’ झाले, राष्‍ट्रपती निवासस्‍थानातील ‘मुघल गार्डन’चे ‘अमृत उद्यान’ झाले आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ झाले, असे मत भाजपचे राज्‍यसभेचे खासदार आणि राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी यांनी व्‍यक्‍त केले. २५ जून या दिवशी भाजपच्‍या वतीने आयोजित प्रबुद्ध नागरिक संमेलनात ते बोलत होते. एम्.जी.एम्. येथील रुक्‍मिणी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

या वेळी केंद्रीय अर्थ राज्‍यमंत्री भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे आणि आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्‍थिती होती. सुधांशू त्रिवेदी पुढे म्‍हणाले की, वर्ष २०१४ मध्‍ये मोदी सरकार आल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशाची नोंद घेतली गेली. आर्थिक विकास, राष्‍ट्रीय सुरक्षा आणि आत्‍मगौरव वाढवणे यांत कमालीचे काम झाले. त्‍यामुळेच अमेरिकेच्‍या संसदेसमोर मार्गदर्शन करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ वेळा निमंत्रित करण्‍यात आले.