हिंदूंना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे जोपर्यंत मंदिरांतून शिकवले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतर होत राहील !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सागर (मध्यप्रदेश) – ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ही देशाची सद्यःस्थिती असून आपण सर्व हिंदू निद्रिस्त आहोत. लोक समजून घेत नाहीत. मला म्हटले जाते, ‘मी प्रक्षोभक विधान करतो.’ माझे विधान प्रक्षोभक नाही, तर हिंदूंना जागे करण्यासाठी आहे. जे घडले ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हिंदूंचे दुर्दैव आहे की, जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय? हिंदु म्हणजे काय? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत राहतील, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले. येथील जयसीनगरमध्ये ३ दिवसांची हनुमंत कथा आयोजित करण्यात आली आहे. याच्या दुसर्‍या दिवशी प्रश्‍नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी एका तरुणाने ‘द केरला स्टोरी’मध्ये ३ मुलींचे धर्मांतर झाल्याचे दाखवण्यात आले आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे?’, असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी वरील उत्तर दिले.


सौजन्य: TIMES NOW Navbharat

धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘‘दुसर्‍या धर्माचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या धर्मात मरणे चांगले आहे.’’ म्हणूनच समुद्रात फेकलेले नाणे परत मिळणार नाही, यावर आपला जितका विश्‍वास असतो, तितकाच विश्‍वास इतर धर्माच्या आणि पंथाच्या व्यक्तीवरही ठेवावा.’’ म्हणजे ते आपल्याशी चांगले वागणार नाहीत, असेच धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.