भारतविरोधी धोरण चालवणार्‍या विदेशी शक्तींना अर्थमंत्री सीतारामन् यांचे सडेतोड प्रत्युत्तर !

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी देशातील कथित निधर्मी नेत्यांना विदेशी माध्यमांचे साहाय्य

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विदेशात खोट्या बातम्यांच्या आधारावर भारतविरोधी धोरण (अजेंडा) चालवणार्‍या शक्तींना ते जेथून हे धोरण चालवत आहेत, तेथे जाऊन सडेतोड उत्तर देत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी त्यांच्या अमेरिका दौर्‍यात भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार आणि चुकीची वागणूक यांविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये  खोट्या गोष्टींवर बनवण्यात येणार्‍या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे स्वाभाविकच भारतविरोधी सर्व शक्ती आणि देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी यांच्या घड्यावर पाणी पडले अन् ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रदूषित विचारांचे प्रदूषण पसरवण्याच्या कामाला लागले. भारतात बसलेले कथित धर्मनिरपेक्षतावादी नेते इतके उघडपणे खोटे बोलत आहेत की, केवळ स्वार्थासाठी भारताला कमकुवत बघायचे स्वप्न पहाणार्‍या विदेशी शक्तींच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर कुणीही विश्वास करणार नाही.

वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर त्यांची भारतासह जगभरात सतत लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे देशातील कथित धर्मनिरपेक्षतावादी पक्षांची झोप उडाली असून आता ते विदेशात भारतातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या खोट्या गोष्टी प्रसारित करवून मोदी सरकार आणि भाजप यांची प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना पाश्चात्त्य माध्यमांचेही सहकार्य आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

२. अर्थमंत्री सीतारामन् यांचे मुसलमानांवरील कथित अत्याचारांच्या अपप्रचाराला ठोस प्रत्युत्तर

अमेरिकेमध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांच्या वक्तव्यांकडे जाण्यापूर्वी काही आकडेवारी पहावी लागेल. त्यानुसार ‘जगभरातील ५० हून अधिक मुसलमान देशांची लोकसंख्या एकत्र करूनही भारताची मुसलमान लोकसंख्या दुसर्‍या स्थानावर आहे. ज्या जलदगतीने भारतात मुसलमान लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाकिस्तानही तिसर्‍या स्थानावर आला आहे. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५१ मध्ये भारतात मुसलमानांची लोकसंख्या ९.८ टक्के (३ कोटी ५४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये वाढून १४.२३ टक्के (१७ कोटी २२ लाख) झाली. वर्ष १९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८४.१० टक्के (३० कोटी ४ लाख) होती, जी वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये घटून केवळ ७९.८० टक्के (९६ कोटी ६३ लाख) राहिली आहे. मागील एका दशकात मुसलमान लोकसंख्या जलदगतीने वाढत आहे. एवढे अत्याचार होत असतील, तर कोणताही समाज एवढ्या जलदपणे त्याची लोकसंख्या कशी वाढवू शकेल ?’

अमेरिकेच्या एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री सीतारामन् यांनी पाकिस्तान आणि काँग्रेस प्रायोजित धोरणाची हवा काढतांना स्पष्टपणे म्हटले, ‘‘भारत मुसलमान लोकसंख्येचे जगातील दुसरे सर्वांत मोठे घर आहे आणि अल्पसंख्यांक सूत्रांवर भारताला दोष देणार्‍यांना वास्तविक स्थितीची कोणतीही माहिती नाही.’’ त्यांनी म्हटले की, जे लोक असे विचार पसरवत आहेत, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, वर्ष २०१४ ते २०२३ या कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या घटली नसून वाढली आहे.

भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून मुसलमानांच्या लोकसंख्येत कधीच न्यूनता आली नाही. याउलट पाकिस्तान ज्याची स्थापना वर्ष १९४७ मध्ये झाली, तेथे धर्माच्या रूपात अल्पसंख्यांकांना नष्ट करण्यात आले. सीतारामन् यांनी भारतात अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसाचाराविषयी पाश्चात्त्य माध्यमांमध्ये प्रकाशित होणार्‍या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतांना म्हटले की, जे अशा प्रकारचे माहिती अहवाल बनवतात, त्यांना सत्यता जाणून घेण्यासाठी भारतात आले पाहिजे आणि वास्तविक स्थिती पाहिली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीवरून त्यांचा अहवाल सिद्ध करू नये. यासाठी मी त्यांना भारतात आमंत्रित करते. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर भारतात मुसलमानांचे जीवन कठीण असते, तर त्यांची संख्या वाढली नसती. ते केवळ वाढतच नाहीत, तर भारतात व्यवसायही करत आहेत. त्यांची मुले शिकत असून त्यांना सुविधाही मिळत आहेत.

३. अर्थमंत्र्यांनी खलिस्तानी षड्यंत्राला प्रत्युत्तर दिल्याने देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त

परकीय भूमीवरून चालवल्या जात असलेल्या खलिस्तानी षड्यंत्रालाही अर्थमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर देशद्रोही धर्मनिरपेक्ष समुदाय संतप्त झाला आणि सामाजिक माध्यमांतील विषारी ‘लिखाणा’चा पूर आला. सर्वप्रथम ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (ए.आय.एम्.आय.एम्.)चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एका मागून एक २७ ‘ट्वीट’ केले आणि रा.स्व. संघ ते सोमालियापर्यंतच्या गोष्टींविषयी बोलले. त्यांनी येथपर्यंत म्हटले की, सत्ताधारी पक्षाकडे एकही मुसलमान खासदार नाही. अशा प्रकारे अनेक खोटी विधाने केली; पण आता त्यांच्या विधानाकडे कुणी लक्ष देत नाही; कारण लोकांना ओवैसींचे सत्य चांगलेच समजले आहे. वास्तविक गोष्ट अशी आहे की, ओवैसी यांना देशातील एकमेव मुसलमान नेते बनायचे आहे; परंतु सध्या ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि ते कधीही तसे होऊ शकणार नाहीत.

४. केंद्र सरकारकडून मुसलमानांवर अनेक योजनांचा वर्षाव होत असतांना कट्टरतावादी मुसलमानांचा मोदी यांना विरोध 

आज धर्मनिरपेक्षतावाद्यांचा खोटारडेपणाही फोल ठरत आहे; कारण भारतात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून सरकारच्या सर्व योजनांचा ३० टक्के लाभ मुसलमान समाजाला मिळत आहे. पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, विनामूल्य रेशन, उज्ज्वल गॅस योजना, मुद्रा योजना, प्रत्येक घरी शौचालय, कर्ज योजना यांसह मोदी सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ मुसलमानांना मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये हजचा कोटा २ लाख रुपये करण्यात आला आहे. गृहनिर्माण योजनेमध्ये मुसलमान समाजाचा वाटा सातत्याने २४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ मुसलमान महिलांना मिळत असल्याने त्यांना आरोग्य सुरक्षा मिळत आहे. मुसलमान समाजाचा देशाच्या मुख्य प्रवाहात समावेश व्हावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांची सरकारे मुसलमान समाजातील महिलांना सशक्त अन् सुरक्षित जीवन जगण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना तिहेरी तलाकच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मुसलमान महिलांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली आहे. आज लक्षावधी मुसलमान महिलांना नरेंद्र मोदींचा अभिमान आहे. आज त्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे सुरक्षित आणि तणावमुक्त जीवन जगू शकत आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकार राज्यातील तिहेरी तलाक पीडित महिलांना आर्थिक आणि सामाजिक साहाय्यही करत आहे. मुसलमान समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी देशातील आणि राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्याची मोहीम राबवत आहे; परंतु दुर्दैवाने मुसलमान कट्टरतावादी याच्या विरोधात आहेत.

५. भारतीय मुसलमानांवरील अत्याचाराच्या कथित कथा सिद्ध करणारे काश्मिरी, पाकिस्तानी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांविषयी गप्प !

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना पसमांदा (दलित आणि मागास मुसलमान) मुसलमानांमध्ये जाण्याचे आवाहन केले, तेव्हापासून धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पोटात दुखू लागले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही १०० मदरशांमध्ये सांगितला गेला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये भीती पसरली आहे की, जे भारतातील मुसलमानांवरील अत्याचाराच्या खोट्या कथा सिद्ध करतात आणि माध्यमांमध्ये प्रसारित करतात. काश्मिरी हिंदूंच्या हत्या आणि पलायन यांवर मौन बाळगणारे हे लोक पाकिस्तान अन् बांगलादेश येथील हिंदु अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगून आहेत. हे तेच लोक आहेत, जे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला निरर्थक आणि मूर्खपणा म्हणतात. हे लोक पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारावर एकही प्रश्न विचारत नाहीत; कारण त्यांना त्यांची मुसलमान मतपेढी चिडण्याची भीती आहे. अमेरिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सांगितले, ‘‘आता भारत पालटत आहे आणि प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.’’

– श्री. मृत्यूंजय दीक्षित (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, हिंदी; एप्रिल २०२३)

संपादकीय भूमिका

अल्पसंख्यांकांच्या कथित अत्याचारावर कांगावा करणारे काश्मिरी हिंदूंच्या हत्या, पाकमधील हिंदूंवरील अत्याचार यांवर गप्प का ?