भरतपूर (राजस्थान) येथे महाराज सूरजमल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याच्या वादातून हिंसाचार

 पुतळे बसवण्यावरून दगडफेक आणि जाळपोळ

भरतपूर (राजस्थान) – भरतपूर जिल्ह्यातील नदबई भागात महाराजा सूरजमल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्यावरून १२ एप्रिलच्या रात्री वाद होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळ यांत झाले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चालू झालेला हा हिंसाचार उत्तररात्री २ वाजेपर्यंत चालू होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

नदबई परिसरात पालिकेच्या वतीने ३ ठिकाणी पुतळे बनवण्यात येणार होते.  विभागीय आयुक्त संवरमल वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता. मात्र ‘बल्लारा हा नदबई येथील मुख्य चौक असल्याने तेथे महाराजा सूरजमल यांचा पुतळा बसवावा’, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या मागणीसाठी लोकांनी ठिय्या आंदोलनही केले होते. १२ एप्रिलला रात्री यावरून वाद होऊन हिंसाचार झाला.