आम्हाला सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला आहे ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

आंतरराष्ट्रीय व्याख्याते, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

अकोला, १० एप्रिल (वार्ता.) – ‘चरखा चालवणार्‍यांमुळे देश स्वतंत्र झाला’, हे आम्हाला शिकवले जाते. ही वास्तविकता नाही. सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला आहे. एक नाही, असे कितीतरी खोट्या गोष्टी लहानपणापासून शिकल्या गेल्या आहेत. असा थेट गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय व्याख्याते, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला. ९ एप्रिल या दिवशी सायंकाळी मुंगीलाल बाजोरीया शाळेच्या प्रांगणात त्यांची जाहीर सभा झाली. राष्ट्र-जागृती मंचाच्या पुढाकाराने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कुलश्रेष्ठ या वेळी म्हणाले –

१. देशात हिंदु विचारधारेची सत्ता आल्यानंतर सनातन धर्माच्या विचारांना जागा मिळत आहे. वास्तविक पहाता, सनातन संस्कृती उज्ज्वल आणि तेजस्वी आहे. असे असतांना मात्र मागून आलेल्या धर्माचे लोक आता सभ्यता शिकवू लागले आहेत. ‘ज्यांनी अनेक वर्षे भारतियांना गुलाम करून ठेवले होते, त्यांच्याकडून एका चरखाधारीने स्वातंत्र्य मिळवले’, असे आपल्याला शिकवले जाते. ज्यांना आपण ‘चाचा’ म्हणतो, त्यांनी स्वातंत्र्याच्या काळात काय केले ? हा इतिहास दूर ठेवला जातो. खरे वाटत नसेल, तर ‘गेटवे ऑफ इंडिया’वरील कोरीव माहिती वाचून काढा.

२. नको त्या लोकांच्या नावे जन्मदिन साजरे केले जातात. मंगल पांडे यांच्यासारख्या शूर आणि थोर व्यक्तीच्या नावाचा जन्मदिन साजरा केला पाहिजे. मंगल पांडे यांनी भगवान परशुराम यांच्याकडून शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे ज्ञान घेतले होते आणि त्या दोन्ही आयुधांचा त्यांनी योग्य वेळी वापर केला.

३. भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा हक्क चाचा नेहरू यांचा नव्हता, तर सुभाषचंद्र बोस यांचा होता. आझाद हिंद फौजेने स्वराज्याची घोषणा केली. स्वतःचे रेडिओ स्टेशन स्थापन केले. ज्याला जगातील ११ देशांनी मान्यता दिली होती. बोस यांच्या घराची वर्ष १९६८ पर्यंत हेरगिरी करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल ब्रिटिशांना पाठवण्यात आला होता.

या वेळी अचानक पाऊस आला, तरीही आसंद्या डोक्यावर घेऊन राष्ट्रभक्तांनी त्यांचे भाषण ऐकले. विशेष म्हणजे कुलश्रेष्ठ यांच्या डोक्यावरही फ्लेक्सची फ्रेम पकडण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

येणार्‍या काळात भारतातील पिढीने ‘इतिहास’ घडवावा, असे वाटत असेल, तर त्यांना खरा इतिहास सांगा !