स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी यात्रेचे आयोजन ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे ठाण्यात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मध्यभागी )

ठाणे – स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे मी स्वागत करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि प्रखर हिंदुत्ववाद, म्हणजे प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे; परंतु आजही सातत्याने सावरकरांचा अपमान केला जात आहे. जाणूनबुजून त्यांच्या विरोधात बोलले जात आहे. अशांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही यात्रा काढली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी हे सावरकरांचा अवमान करत आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा चालू केली आहे. ही यात्रा ठाणे येथे आली असता मुख्यमंत्रीही त्यात सहभागी झाले. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान देशात कुणीही सहन करणार नाही’, असा संदेश या यात्रेद्वारे आम्ही देत आहोत. सावरकरांचे विचार घराघरात पोचवणे हाही या यात्रेमागील उद्देश आहे.’’