
एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

प्रतिनिधी : श्री. चंद्रशेखर गुडेकर आणि श्री. हर्षद पालये
रत्नागिरी, ३१ मार्च (वार्ता.) – एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजावेत, अशी दयनीय स्थिती रत्नागिरीच्या मुख्य बसस्थानकाची आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात बसस्थानकातीलच मुतारीचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. हे दुर्गधीयुक्त सांडपाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारे साचले असून त्यातूनच मार्ग काढत प्रवाशांना बसस्थानकात जावे लागते.
१. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर साठलेल्या मुतारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडला असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी तुंबले आहे. बसस्थानकामधील प्रसाधनगृह अस्वच्छ आहे.

२. बसस्थानकाचा संपूर्ण परिसर खड्डेमय झालेला आहे. रत्नागिरीमधील मुख्य बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वर्ष २०१८ मध्ये चालू करण्यात आल्याने तेव्हापासून हे बसस्थानक रहाटघर येथे स्थलांतरित करण्यात आले; परंतु त्याचे स्थलांतर करतांना त्या ठिकाणी प्रवाशांना किमान सुविधा उपलब्ध करणे, प्रवाशांना बसण्याची जागा स्वच्छ नसणे, बसस्थानकाचा परिसर व्यवस्थित करणे या प्राथमिक गोष्टीही करण्यात आलेल्या नाहीत.



३. नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप १० टक्केही झालेले नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे बसस्थानकाची व्यवस्था रहाटघर येथेच असणार आहे.
४. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या नळांपैकी केवळ १ नळ चालू असून अन्य ४ नळ बंद आहेत.

५. बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी कुलर बसवण्यात आला आहे; परंतु पाणी घेण्यासाठी भांडे ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना ओंजळीने पाणी प्यावे लागते. परिणामी पाणी खाली सांडून भूमीवर पसरते. त्यामुळे चिखल होतो.
६. अपुर्या संख्येमुळे अनेकदा बसगाड्या सोडण्यासाठी वाहक-चालक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नियोजित गाड्या आयत्या वेळी रहित कराव्या लागतात. परिणामी बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागते.
७. बसस्थानकावर गाड्यांचे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे नवीन येणार्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यात गाड्यांची चौकशी करण्यासाठी गेल्यास अनेकदा विचारूनही कर्मचारी गाड्यांची नीट माहिती देत नाहीत.
८. एकंदरित रहाटघर बसस्थानकाची जागा मोजकी असली तरी ५ वर्षांत तेथे प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसस्थानकाच्या परिसरातील खड्डे भरणे, कचर्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन, बसगाड्यांचे वेळापत्रक लावणे आदी प्राथमिक गोष्टीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

|
|

गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन