अखिल मानवजातीला घडवणारे एकमेवाद्वितीय ज्ञानगुरु, मोक्षगुरु आणि जगद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा संकल्प अन् अस्तित्व यांमुळे होणारे धर्मसंस्थापनेचे कार्य, यांविषयी मी अनुभवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सार्वजनिक प्रवचन ऐकल्यावर सनातनच्या कार्यात सहभागी होणे

वर्ष १९९७ मध्ये कुडचडे, गोवा येथे मी प.पू. डॉ. आठवले यांचे सार्वजनिक प्रवचन ऐकले. तेव्हापासून मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी आहे. सनातनच्या सत्संगांत गेल्यामुळे मला अध्यात्माचे ज्ञान मिळाले. मला ते ज्ञान इतरांना सांगण्याची संधी आणि स्फूर्ती मिळाली. अशा प्रकारे अनेक साधक आता प्रवचन घेत आहेत. ही परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.

श्री. श्रीराम खेडेकर

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चमत्कार करण्यात शक्ती वाया घालवायची नाही, असे सांगणे

त्या वेळी सनातनचे सेवाकेंद्र फोंडा येथे होते. मला प.पू. डॉक्टरांच्या काही प्रवचनांना उपस्थित रहाण्याची संधी लाभली, तसेच ते साधकांसाठी करत असलेल्या मार्गदर्शनाचा लाभही झाला. त्यांनी एका मार्गदर्शनात सांगितले, मला चमत्कार करण्यात शक्ती वाया घालवायची नाही; परंतु आज मी तुमच्यासाठी पहिला आणि अंतिम चमत्कार दाखवणार आहे. त्यांनी हाताची मूठ घट्ट केली. त्यांनी काही साधकांना हाताची मूठ सोडून दाखवायला सांगितले. साधकांनी प्रयत्न करूनही त्यांना प.पू. डॉक्टरांची मूठ सोडवणे शक्य झाले नाही. (सिद्धी प्राप्त होणे, हा साधनेतील एक टप्पा आहे. सिद्धी प्राप्त झाल्यावर अहं वाढून साधनेत घसरण होण्याचा धोका असतो. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना सिद्धीत अडकू नका, असे सांगतात. – संकलक)

३. एकदा प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितले, सनातन संस्थेचे सूक्ष्मातील कार्य समाजातील सर्वसामान्य व्यक्तींच्या लक्षात येणार नाही. ते केवळ संत आणि काही साधक यांच्याच लक्षात येईल.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ईश्‍वरी राज्य स्थापन होण्यासाठी संत घडवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ईश्‍वरी राज्य आणण्यासाठी १०० संतांची आवश्यकता आहे. साधकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आतापर्यंत गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) १२० हून अधिक संत घडवले आहेत, तसेच सहस्रो साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत. गुरुदेवांनी समाजातील धर्म आणि राष्ट्र यांचे कार्य करणार्‍या व्यक्तींची आध्यात्मिक पातळी ओळखून त्यांची संत म्हणून जगाला ओळख करून दिली आहे, तसेच २ बालकांची बालसंत म्हणून ओळख करून दिली आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे धर्मसंस्थापनेचे कार्य होत असणे

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राची उद्घोषणा करणे आणि त्यांच्या कार्यात दिवसेंदिवस वृद्धी होत असणे : सूर्य उगवल्यावर फुले उमलतात, त्याचप्रमाणे गुरुदेवांच्या कृपेमुळे सध्या चांगल्या घटना घडत आहेत, असे साधक अनुभवत आहेत. गुरुदेवांनी प्रथम हिंदु राष्ट्राची उद्घोषणा केली. ते साधकांना समवेत घेऊन अफाट धर्मकार्य करत आहेत. त्या कार्यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याला यश मिळत आहे, हे साधक अनुभवत आहेत.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ग्रंथसंपदा

परात्पर गुरु डॉक्टरांनी फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध भाषांतील ३६० हून अधिक ग्रंथांचे संकलन करून ज्ञानाचे भांडार मानवजातीला उपलब्ध करून दिले आहे आणि ५ सहस्र ग्रंथ होतील, इतके लिखाण उपलब्ध झाले आहे. त्याचा पुढील सहस्रो वर्षे उपयोग होईल. परात्पर गुरु डॉक्टरांच्या तेजस्वी विचारांचे कुणीही खंडन करू शकत नाही, एवढे ते सत्य आहेत, हे वाचकांच्याही लक्षात येत आहे.

७. सप्तर्षींनी वर्णिलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता !

मानवजातीला सुसंस्कारित करून घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. आम्ही त्यांच्यासम महान गुरु पाहिले नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेव ज्ञानगुरु, मोक्षगुरु आणि जगद्गुरु आहेत, हे सत्य सप्तर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे शंका घेण्यास कुठेही वाव नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जयजयकार असो !

हे मनोगत व्यक्त करून घेतल्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, फोंडा, गोवा. (२०.५.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक