मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा ! – मनसेकडून प्रशासनाला १५ दिवसांची समयमर्यादा

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट !

मनसेचे नेते अविनाश जाधव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना

ठाणे, २४ मार्च (वार्ता.) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचे प्रकरण उघड केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून ७ ते ८ अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती मनसेच्या ठाणे शहर शाखेने उघडकीस आणली आहे. यासह ‘मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे १५ दिवसांत हटवा अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू’, अशी चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. यासाठी मनसेने ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

सौजन्य : ABP MAJHA

मुंब्रा येथील पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारीत येतो. या डोंगराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत धर्मांधांकडून दर्ग्यांची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. ‘प्रथमदर्शनी या दर्ग्यांची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश दिसून येतो’ असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

असे प्रशासनाला का सांगावे लागते ? त्यांना स्वतःहून कळत नाही का ?

अनधिकृत दर्ग्यांना अनेक सरकारी खात्यांचे समर्थन ?

या अवैध बांधकामांना वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीजवितरण विभाग, ठाणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग यांच्याकडून सर्व सोयीसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत ? कोण त्यांना पाठीशी घालत आहे ? या सर्व गोष्टींची माहिती घेऊन येत्या १५ दिवसांत हे अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी चेतावणी अविनाश जाधव यांनी दिली आहे.