पोलिसांवर आक्रमण करणार्‍यांवर सरकारने जरब बसवावी ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यातील पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ !

अजित पवार

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस २४ घंटे कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात; मात्र कर्तव्य बजावत असतांना त्यांच्यावरच आक्रमणे होत आहेत. गेल्या ३ मासांत ३० हून अधिक आक्रमणे पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर आक्रमण करण्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणार्‍यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र प्रविष्ट करण्याची आवश्यकता आहे. या आक्रमणांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर आक्रमण करणार्‍यांवर सरकारने जरब बसवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

अजित पवार म्हणाले की, राज्यात पोलिसांच्या अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसमवेत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनांत वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर विविध ठिकाणी आक्रमण होण्याच्या घटना वाढत असून पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी आणि मोटारसायकल इत्यादी गोष्टी पुरवण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि अशी आक्रमणे होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी त्यांनी मागणी केली.