मुंबईतील प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या वास्तूच्या भिंतींना तडे !

वास्तूला ९९ वर्षे पूर्ण

‘गेटवे ऑफ इंडिया’

मुंबई – अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील ‘गेटवे ऑफ इंडिया’ (मुंबईचे प्रवेशद्वार) या वास्तूला ९९ वर्षे झाली आहेत. आता या वास्तूच्या भिंतींना तडे गेले आहेत. या वास्तूच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकार समोर आला.

‘गेटवे ऑफ इंडिया’चे बांधकाम इंग्रजांनी वर्ष १९११ मध्ये चालू केले. वर्ष १९२४ मध्ये ही इमारत उभी राहिली. ४ डिसेंबर १९२४ पासून ही वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. सर्वेक्षणाच्या वेळी वास्तूच्या दर्शनी भागात भेगा पडल्याचे, इमारतीच्या अनेक भागांत छोटी रोपे उगवल्याचे, तसेच घुमटावरील ‘वॉटरप्रूफिंग’ आणि सिमेंट-काँक्रिट यांचीही हानी झाल्याचे निदर्शनास आले.

पुरातत्व विभागाकडून नूतनीकरणासाठी ६.९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर

वर्ष २०२२ मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे येथील भिंतींची पुष्कळ हानी झाली. हा प्रकार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. राज्याच्या पुरातत्व विभागाने ‘गेटवे’च्या नूतनीकरणासाठी ६ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे; मात्र त्याला अजूनही संमती मिळालेली नाही.