महापालिकेच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिसमस लादू नये !

  • समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे जळगाव महानगरपालिकेकडे मागणी !

  • धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अभिनंदन !

उपमहापौर  १ कुलभूषण पाटील निवेदन यांना देतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – अनेक शाळांमध्ये त्यातही विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ डिसेंबर या दिवशी ख्रिसमस साजरा करण्याचे प्रस्थ वाढत आहे. बहुतांश शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांनाही ख्रिसमस साजरा करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यासाठी ‘सांताक्लॉज’ची वेशभूषा करण्यास सांगितली जाते. खरे पहाता ख्रिसमसशी संबंध नसतांनाही हिंदूंना अशा कृती करायला लावणे चुकीचे आहे. जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांनी विनाकारण हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिसमस अणि सांताक्लॉज या पद्धती लादू नयेत, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना दिले. (हिंदूबहुल महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे निवेदन देण्याची वेळ येणे दुर्दैवी ! यासाठी हिंदु राष्ट्रच स्थापायला हवे ! – संपादक) या निवेदनावर हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी, गोवर्धन गोशाळेचे सुनील चौधरी, व्यावसायिक प्रशांत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, निखिल कदम, व्यावसायिक पवन सिंधी आदींनी स्वाक्षर्‍या केल्या.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. हिंदु विद्यार्थ्यांना शाळेत ख्रिस्ती संस्कृतीचे शिक्षण दिले जात असेल, तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. शाळा म्हणजे विद्येचे केंद्र आहे. त्यांना कृपा करून धर्मांतराचे अड्डे बनवू नका.

२. एखाद्या शाळेत ख्रिस्ती धर्माचे विद्यार्थी असल्यास त्यांच्यासाठी अवश्य ख्रिसमस साजरा करता येईल; पण हिंदु विद्यार्थ्यांना ते करायला लावणे चुकीचे आहे.

३. महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झालेला आहे. त्यानुसार ‘सांताक्लॉज’ या काल्पनिक पात्राचे शाळेत उदात्तीकरण करणे म्हणजे अंधश्रद्धेचा प्रसार करण्यासारखे आहे. त्यामुळे या कायद्यानुसार ही कारवाई करता येऊ शकते.

महानगरपालिकेच्या शाळेत अशी सक्ती केली जात नाही आणि जाणारही नाही ! – उपमहापौर

जळगाव महानगरपालिकेच्या शाळेत अशी कोणतीही सक्ती केली जात नाही आणि केलीही जाणार नाही. या निवेदनाची योग्य ती नोंद घेण्यात येईल.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या सण-उत्सवांनुसार अन्य धर्मीय कधीच कृती करत नाहीत, मग हिंदूंवरच अन्य धर्मियांचे सण साजरे करण्याची बळजोरी का ? याला हिंदूंनी विरोध करायलाच हवा !