इस्लामी देशांच्या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीरच्या दौर्‍यावर !

भारताने इस्लामी देशांच्या संघटनेला फटकारले

नवी देहली – इस्लामी देशांची संघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ला (‘ओआयसी’ला) भारताने पुन्हा एकदा फटकारले आहे. काश्मीरविषयी सतत वेगवेगळ्या व्यासपिठांवरून भाषणे केल्यानंतर आता या संघटनेचे महासचिव पाकव्याप्त काश्मीर दौर्‍यावर आले आहेत. ‘ओआयसी’च्या या कृतीचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे.

१. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही ‘ओआयसी’च्या महासचिवांच्या पाकव्याप्त काश्मीर भेटीचा आणि या भेटीच्या वेळी जम्मू आणि काश्मीरविषयी केलेल्या वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो. ‘ओआयसी’चा जम्मू-काश्मीरशी काहीही संबंध नाही. तो भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. ‘ओआयसी’ने आधीच त्याची विश्‍वासार्हता गमावली आहे. ‘ओआयसी’चे महासचिव दुर्दैवाने पाकिस्तानचे प्रवक्ते बनले आहेत.

२. इस्लामिक देशांच्या संघटनेचे महासचिव, हिसेन ब्राहिम ताहा यांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिल्यानंतर सांगितले की, काश्मीर वादाला ‘ओआयसी’च्या कार्यसूचीमध्ये सर्वोच्च प्राधान्य आहे. इस्लामी देशांची संघटना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संवादाचा मार्ग शोधत आहे जेणेकरून काश्मीर वाद सोडवला जाऊ शकेल.

३. ब्राहिम ताहा म्हणाले, ‘‘काश्मीर वाद हे एक राजनैतिक सूत्र आहे ज्यावर रस्त्यावर उभे राहून चर्चा होऊ शकत नाही; म्हणूनच आम्हाला या सूत्रावर इतर देश, संघटना यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांना सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्याऐवजी काश्मीर समस्येत नाक खुपसणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेला समजेल, अशा भाषेत भारताने उत्तर देणे आवश्यक !