मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात ! – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाता – कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला. कोलकाता पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की, मोमीनपूरमधील हिंसाचाराच्या कालावधीत ५ सहस्र हिंदूंनी कोलकाता येथून पलायन केले आहे. या प्रकरणी शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेपासून राजभवनापर्यंत मोर्चा काढला आणि नंतर राज्यपालांना निवेदन सादर केले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून केंद्रीय पोलीस दल तैनात करण्याची मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना शुभेंदू अधिकारी म्हणाले की, त्यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हिंसाचारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा  केली. हिंसाचारात घायाळ झालेले ३ पोलीस अधिकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.