दसरा मेळाव्यात नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावे ! –  देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

डावीकडून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

मुंबई – दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी होणार आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पारश्वभूमीवर दोन्ही गटांतील नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावे. भाषणे करतांना कायदा मोडला, तर कायदा आपले काम करेल, अशी चेतावणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर २ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

फडणवीस म्हणाले की, राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून मांडले जावेत. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा अपलाभ घेऊ नये, याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष आहे.