राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्‍वस्त मंडळ अंतत: विसर्जित !

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे आदेश

शिर्डी (जिल्हा नगर) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या राजकीय घोळानंतर नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून अंतत: विसर्जित करण्यात आले आहे. पुढील ८ आठवड्यांत नवीन विश्‍वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे. तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानाचा कारभार सोपवण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिला आहे.

सध्याचे विश्‍वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नव्हते; त्यासाठीचे आवश्यक निकष पाळले गेले नव्हते, असे आक्षेप घेणार्‍या याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यांवर एकत्रित सुनावणी होऊन १३ सप्टेंबर या दिवशी वरील आदेश देण्यात आला. कोपरगावमधील साईभक्त तथा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह अन्य काही भक्तांनी याचिका प्रविष्ट केल्या होत्या.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनीच संघटित पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत !