‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु तरुणींचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र ! – आमदार नितेश राणे

आरोपींशी आर्थिक लागेबंधे असल्याने दीपक बर्डे पोलिसांना सापडत नसल्याचा आरोप  

आमदार नितेश राणे

नगर – ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुसलमान तरुणांना प्रतिदिन २०० रुपये आणि ‘हिरोगिरी’ करण्यासाठी नवीन दुचाकी दिली जाते. हिंदु तरुणींना फसवणे आणि त्यांचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र आहे. त्याला हिंदु तरुणी बळी पडत आहेत. हिंदु तरुण दीपक बर्डे याचे अपहरण केल्याच्या प्रकरणात ५-६ आरोपींना अटक केली आहे; परंतु पोलिसांना त्यांच्याकडून दीपक बर्डे याचा काहीच सुगावा लागत नाही. यावर विश्‍वास बसत नाही. आरोपींचे पोलिसांशी लागेबंधे आहेत. आमच्याकडे असलेली नावे आम्ही संबंधितांना देणार आहोत. आरोपींशी आर्थिक संबंध ठेवणारे पोलीस आरोपींवर कसे कारवाई करतील ?, असा घणाघात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवर केला. १० सप्टेंबर या दिवशी येथील विश्रामधाम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणांविषयी नितेश राणे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘मुसलमान तरुण हिंदु तरुणींना फसवून विवाह करतात. प्रथम ‘माझे नाव ‘अमर’ आहे’, असे सांगितले जाते. विवाहानंतर हिंदु तरुणी त्याच्या घरी गेल्यानंतर हिंदु तरुणीला तो ‘अली’ असल्याचे समजते. हिंदु तरुणीला इस्लाम पंथानुसार आचरण करण्यास सांगितले जाते. काही दिवसांनंतर किंवा मुले झाल्यानंतर हिंदु तरुणींचे धर्मांतर करून त्यांना इस्लाम पंथ स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाते. याला विरोध करणार्‍या हिंदु तरुणींना बळजोरीने परदेशात पाठवले जाते किंवा त्यांची विक्री करण्यात येते. हिंदु तरुणींना विकण्याचे दरपत्रक मी विधीमंडळात दाखवले आहे. अशा विवाहांना पालकांची मान्यता नसते. २ सहस्र रुपये देऊन विवाहाचे खोटे प्रमाणपत्र मिळवले जाते. महाराष्ट्र पोलीस एवढे सक्षम आहेत की, अमेरिका, रशिया आणि इराण येथील चालू घडामोडी त्यांना लगेच समजतात; मात्र पोलिसांना दीपक बर्डे सापडत नाही. यावरून पोलीस विभागातील काही पोलिसांचे आरोपींशी संगनमत झाले आहे, हे स्पष्ट होते.’’