जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरातून पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्तींची चोरी !

समर्थांनी स्थापन केलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती, तसेच ऐतिहासिक पंचायतनही चोरीला गेले

मूळ मूर्ती (चोरीला गेलेल्या मूर्ती चौकोनात दिसत आहेत)

जांब समर्थ – जालना जिल्ह्यातील घानसावंगी येथील जांब समर्थ म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्या जन्मगावी असलेल्या श्रीराम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. यात समर्थ रामदासस्वामींनी स्थापित केलेली राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींचाही समावेश आहे. त्यासह ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रुघ्न), तसेच रामदासस्वामी झोळीत ठेवत असलेली, तसेच दंडाला बांधत असलेली मारुतीची मूर्ती यांचीही चोरी झाली. पहाटे ३ वाजता चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञातांनी पाळत ठेवून मंदिरातील चावी घेऊन चोरी केली आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. जालना येथून श्‍वान पथकही बोलावले आहे. हे श्रीराम मंदिर रामदासस्वामी यांच्या घरामध्ये स्थित आहे.

‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र असणार्‍या जांब समर्थ येथील मंदिर चोरी प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन कारवाई करण्याची आमदार राजेश टोपे यांची मागणी !

पावसाळी अधिवेशनात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी चोरीची घटना सांगितली. ते म्हणाले, ‘‘चोरीच्या घटनेमुळे जनमानसात रोष आहे. येथील श्रीराम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. राज्यशासनाने या स्थळाला ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन कारवाई करावी.’’

आरोपींना पकडून मूर्ती परत आणण्याचे आदेश दिल्याचे गृहमंत्र्यांचे प्रतिपादन !

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मी याविषयी पोलीस अधिकार्‍यांशी बोललो आहे. संपूर्ण शक्तीनिशी या प्रकरणाची चौकशी करावी आणि ‘आरोपींना पकडून सर्व मूर्ती परत आणाव्यात’, असे आदेश दिले आहेत.’’

संपादकीय भूमिका

  • तीर्थक्षेत्राचा दर्जा असणार्‍या मंदिरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे हा हिंदु धर्मावरील मोठा आघातच होय !
  • चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईंपर्यंत हिंदूंनी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या !