हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश ! – श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची स्वीकृती

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे

कोलंबो – हिंद महासागरात खरी सुरक्षितता प्रदान करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ‘इकॉनॉमिस्ट’ या अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. श्रीलंकेने भारताचा विरोध डावलून चीनच्या ‘युआन वांग ५’ या हेरगिरी करणार्‍या जहाजाला श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर येण्याची अनुमती दिली होती. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. रानिल विक्रमसिंघे पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत आपण हिंद महासागरातील वर्चस्वाची लढाई दूर ठेवू शकलो होतो; परंतु आता समतोल कायम राखणे फार कठीण बनले आहे. हिंद महासागर हे महासत्तांच्या शक्ती प्रदर्शनाचे केंद्र बनू शकते.’’

संपादकीय भूमिका

  • भारताचा विरोध डावलून चीनच्या हेरगिरी जहाजाला पायघड्या घालणार्‍या श्रीलंकेकडून भारताला आता खूश करण्यासाठीच असली विधाने केली जात आहेत, हे भारताने लक्षात घ्यावे आणि विश्‍वासघातकी चीनला ‘जशास तसे’ धडा शिकवावा !
  • हिंद महासागराला असुरक्षित आणि युद्धभूमी बनवू पहाणार्‍या चीनला कवटाळणार्‍या श्रीलंकेचा दुतोंडीपणाच यातून उघड होतो !