देशात सनदी अधिकार्‍यांची १ सहस्र ४७२ पदे रिक्त

नवी देहली – देशात सनदी अधिकार्‍यांची १ सहस्र ४७२ पदे रिक्त आहेत. अधिकार्‍यांच्या कमरतेमुळे प्रतिवर्षी राज्यांतून केंद्रीय प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांच्या संख्येत घट होत आहे. केंद्र सरकार संयुक्त सचिव, तसेच इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या तुटवड्यामुळे इतर सेवांतून ही आवश्यकता भागवली जात आहे.

 

रिक्त पदांपैकी ८५० पदांची केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे थेट आय.ए.एस्. अधिकार्‍यांची भरती होणार होती. राज्य सरकारकडून बढती देऊन भरती अपेक्षित असलेल्या रिक्त पदांची संख्या ६२२ आहे. नियोजित पदांच्या संख्येत अधिकार्‍यांची नियुक्ती झाली नसल्याने दुसर्‍या सेवेतील अधिकार्‍यांकडे या पदांचे दायित्व देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

आधीच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी कामामध्ये दिरंगाई करत असतात, हा अनुभव जनता घेत असते. त्यात त्यांची संख्याच पुरेशी नसेल, तर प्रशासकीय कामे किती प्रलंबित रहाणार, याचा विचारच करायला नको. अशाने देशाचे प्रशासन गतीमान होण्याऐवजी कूर्मगतीचे असणार, यात शंकाच नाही !