शरणागतभाव

गुरु किंवा ईश्वर यांना ‘संपूर्णपणे शरण जात आहे’, असे म्हणून प्रार्थना केल्याने शरणागती वाढण्यास साहाय्य होते. तीव्र प्रारब्ध भोगून संपवतांना शरणागती वाढते. प्रारब्धभोग, दुःख, अडचणी, संघर्षाचे प्रसंग हे सर्व म्हणजे जणू आपली शरणागती वाढवण्याची संधीच असते. एखादा प्रसंग किंवा परिस्थिती स्वीकारता येत नसतांना होणार्‍या संघर्षाच्या वेळी ईश्वराला संपूर्णपणे शरण गेले की, ईश्वर लगेचच काहीतरी मार्ग सुचवतो आणि आपल्याला योग्य विचार देऊन बळ देतो. जणू आपण त्याला शरण यावे म्हणूनच त्याने तशी परिस्थिती निर्माण केलेली असते ! म्हणून असे प्रसंग, परिस्थिती किंवा संघर्ष होण्याची वेळ येण्यापूर्वीच ईश्वराप्रती सतत शरणागती व्यक्त करत राहिले, तर स्थिरता वाढून प्रसंगांना योग्य प्रकारे सामोरे जाता येते. त्यामुळे स्वतःच्या हतबलतेची जाणीव वाढून कर्तेपणा ईश्वरचरणी अर्पण होतो. गुरु किंवा ईश्वर यांना सतत शरण जात रहाणे म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे !