भारताचा अपप्रचार करण्यासाठी पाककडून युरोपमध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न !

‘फ्रेंड्स ऑफ कश्मीर’ आणि ‘यासीन मलिक डिफेंस कमिटी’ या नावांनी भारतविरोधी मोहिमा !

इस्लामाबाद – भारताच्या विरोधात ‘हाइब्रिड वॉर’ (शत्रूविषयी खोटी माहिती प्रसृत करून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणे) लढणार्‍या पाकिस्तानकडून ब्रिटन, तसेच अन्य युरोपीय देशांमध्ये सातत्याने भारताविषयी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘डायरेक्ट्स’ या ग्रीसच्या प्रसारमाध्यमाने पाकचे हे षड्यंत्र उघड केले आहे. (जी माहिती ग्रीससारख्या देशाला मिळते, ती भारताला का मिळत नाही ? – संपादक) त्यानुसार पाकव्याप्त काश्मीरचे कथित राष्ट्रपती सुलतान महमूद यांनी भारताच्या विरोधात ‘फ्रेंड्स ऑफ कश्मीर’ आणि ‘यासीन मलिक डिफेंस कमिटी’ या नावांनी दोन मोहिमा हाती घेतल्या आहेत.

‘डायरेक्ट्स’ने दिलेल्या माहितीनुसार,

१. महमूद यांनी भारताच्या विरोधात यंत्रणा उभी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची समयमर्यादा ठेवली आहे. यासाठी ब्रिटन, तसेच युरोपातील मोठी शहरे आणि क्षेत्रे येथील मशिदी अन् पाकचे दूतावास यांचा वापर केला जाणार आहे. यासाठी पाकमधील कट्टरतावादी, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील विदेशात रहाणारे लोक यांचेही साहाय्य घेतले जाणार आहे.

२. या मशिदींच्या पाठीशी पाकिस्तानी दूतावास सदैव उभे असतात. मशिदींमधील इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारे) पाकमधून आलेल्या प्रवाशांना नोकरी देण्यासाठी साहाय्य करतात आणि या माध्यमातून त्यांना भारतविरोधी कारवायांत सहभागी करून घेतात. पाककडून करण्यात येणार्‍या दुष्प्रचारास युरोपातील लोक सहज भूलतात.

३. पाकिस्तान अनेक वेळा लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतांना याच मशिदी, पाकमधून आलेले प्रवासी आणि राजकीय पक्ष यांचे साहाय्य घेतो.

पाकमधील मुसलमानांची युरोपातील निवडणुकींत महत्त्वपूर्ण भूमिका !

ब्रिटन आणि अन्य युरोपीय देश यांमध्ये संसदेच्या निवडणुकांमध्ये मुसलमान मतदारांचे पुष्कळ महत्त्व आहे. यांपैकी अनेक मुसलमान हे पाकमधून युरोपमध्ये स्थायिक झालेले आहेत. यांत पाकव्याप्त काश्मीरमधील मुसलमानांची संख्याही लक्षणीय आहे. ब्रिटनच्या ‘लीड्स’ क्षेत्रातील ५.४३ टक्के मतदार हे मुसलमान आहेत, तर नॉटिंघममध्ये हीच संख्या ८.८ टक्के इतकी आहे. अन्य काही क्षेत्रांमध्ये ही संख्या ८ ते २४ टक्क्यांपर्यंतही आहे.

संपादकीय भूमिका 

पाक डावपेचात भारतापेक्षा हुशार ! आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताची मानहानी करणार्‍या पाकला भारताने आता तरी धडा शिकवावा !