चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री

विदेशमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही. पूर्व लडाखच्या सीमावादावर बोलतांना जयशंकर म्हणाले, ‘‘चीनने उभय देशांमध्ये वर्ष १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारांचे उल्लंघन करत पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात केले होते. चीनला वास्तविक नियंत्रणरेषेमध्ये एकांगी पालट करायचा होता. हे लक्षात घेऊन कोरोना महामारीशी संघर्ष करत असतांनाही भारताने पूर्व लडाखमध्ये सैन्याला पाचारण केले होते.’’ विदेशमंत्री पुढे म्हणाले की, मला असे वाटते की, आपल्या देशाने केलेले हे प्रयत्न जनता, तज्ञमंडळी आणि राजकीय पक्ष कुणीच समजू शकले नाही. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाला चीनच कारणीभूत होता.