काशी विश्‍वनाथ मंदिराविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानफटात मारली !

लखनौ विद्यापिठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक रविकांत चंदन (डावीकडे)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लखनौ विद्यापिठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक रविकांत चंदन यांना कार्तिक पांडे या विद्यार्थ्याने कानफटात मारली. विद्यापिठाच्या परिसरात ही घटना घडली.

१. ७ मे या दिवशी एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातील चर्चासत्रात वाद झाला होता. या चर्चासत्रात प्रा. रविकांत चंदन सहभागी झाले होते. त्यांनी दिवंगत पट्टाभी सीतारामय्या यांच्या ‘पंख आणि दगड’ या पुस्तकाचा संदर्भ देत म्हटले, ‘मोगल सम्राट औरंगजेबाने वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडले; कारण तेथे  व्यभिचार झाला होता.’ (क्रूरकर्मा औरंगजेबाने मंदिर पाडल्याच्या घटनेचे अशा प्रकारे समर्थन करणारे प्राध्यापक भावी पिढीवर काय संस्कार करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक)

२. याच सूत्रावरून कार्तिक पांडे याने प्रा. रविकांत यांच्या कानफटात मारली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनीही कार्तिक याला पोलीस ठाण्यात आणले. या वेळी दोघेजण एकमेकांवर मारहाणीचे आरोप करू लागले; मात्र दोघांनीही पोलिसांकडे लेखी तक्रार केलेली नाही.

३. काशी विश्‍वनाथ मंदिरावरील वक्तव्यानंतर प्राध्यापक रविकांत यांच्या विरोधात आंदोलन चालू झाले होते. यानंतर १० मे या दिवशी हसनगंज पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक स्थळांविषयी कुणी आक्षेपार्ह विधान करत असेल, तर पोलिसांनी स्वतःहून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास आश्‍चर्य ते काय ?