(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनेची हिंदूंना धमकी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेने ‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी एका पत्राद्वारे दिली. पुलवामा जिल्ह्यातील स्थलांतरिताच्या संकुलात रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना धमकीचे हे पत्र मिळाले. काही दिवासांपूर्वीच काश्मीरमधील बडगाम येथे राहुल भट या काश्मिरी हिंदूची तहसीलदार कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मिरी हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल यांच्या हत्येनंतर काश्मिरी हिंदूंनी रस्त्यावर उतरत केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती, तसेच काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा आरोपही केला होता.

स्थलांतरित संकुलाच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आले आहे. यात म्हटले आहे, ‘सर्व स्थलांतरित आणि रा.स्व. संघ यांचे हस्तक यांनी काश्मीर सोडून जावे, अन्यथा मरायला सिद्ध व्हा. काश्मीरमध्ये आणखी एक इस्रायल करून काश्मिरी मुसलमानांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी हिंदूंना येथे जागा नाही. तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट सुरक्षा दिली, तरीही तुम्ही मरणारच.’ (अशी धमकी केंद्र आणि राज्य सरकार यांना आव्हानच म्हणावे लागेल ! या जिहादी आतंकवादी संघटनांना पाकचे पाठबळ असल्याने पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे दुरापस्तच होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
  • अण्वस्त्रधारी भारताला मूठभर जिहादी आतंकवादी ३ दशके भारी पडतात आणि भारत त्यांना मुळसह नष्ट करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे लज्जास्पद !