सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सोजत रोड (राजस्थान) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

व्यासपिठावर डावीकडून श्री. पियुष त्रिवेदी आणि सभेला संबोधित करतांना श्री. आनंद जाखोटिया

सोजत रोड (राजस्थान) – संपूर्ण जगात सनातन धर्माला राजाश्रय असलेला एकही देश नाही. भारतात हिंदू बहुसंख्यांक असूनही हिंदु श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी प्रतिदिन संघर्ष करावा लागतो. राज्यघटनेत गोहत्या बंदी नमूद आहे; परंतु अद्याप त्याविषयीचा कायदा करण्यात आला नाही. सरकारी अनुदानाने अल्पसंख्यांक त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात; मात्र बहुसंख्य हिंदूंना ही सवलत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण करण्यात येते; पण अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत नाही. त्यामुळे हिदूंशी होणारा हा भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. समितीच्या वतीने येथील आदर्श विद्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.  त्या वेळी ते बोलत होते.

या सभेचा प्रारंभ सनातनच्या पू. (श्रीमती) सुशीला मोदी, हरियालो राजस्थान आणि गोग्रास समितीचे संस्थापक श्री. पियुष त्रिवेदी, धर्मप्रेमी श्री. गौतमचंद राठोड आणि श्री. आनंद जाखोटिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. समितीच्या कार्याचा परिचय डॉ. स्वाती मोदी यांनी, तर सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. दीपक लढ्ढा यांनी केले.

दीपप्रज्वलनानंतर प्रार्थना करतांना डावीकडून श्री. आनंद जाखोटिया, पू. (श्रीमती) सुशीला मोदी, श्री. पियुष त्रिवेदी आणि श्री. गौतमचंद राठोड

हिंदु जनजागृती समितीचे संस्कृती संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद ! – पियुष त्रिवेदी, संस्थापक, हरियालो राजस्थान आणि गोग्रास समिती

आम्ही आमची भाषा, वेशभूषा आणि भोजन सोडले आहे. त्यामुळे आज लोकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. आम्हाला अभिमानाने आपल्या संस्कृतीचे पालन करून धर्म वाढवला पाहिजे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची मृदू भाषा, धर्माचरण, टिळा लावून सर्वांचे स्वागत करणे हे आमच्या संस्कृती संवर्धनाचे कौतुकास्पद प्रयत्न आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी कु. पूनम लढ्ढा हिने उपस्थितांकडून हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा करवून घेतली. या वेळी न्यू जोधपूर मिष्ठान्न भांडारचे श्री. कमलदासजी वैष्णव, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री. बसंतसिंह लखावत, श्री. दलपतसिंह ठाकर आदी उपस्थित होते.