कुटुंबियांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना आनंद देण्यासाठी धडपड करणारे अन् सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे पुणे येथील श्री. सुयोग जाखोटिया !

२.३.२०२२, माघ अमावास्या या तिथीला मूळचे सांगली येथील आणि आता पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. सुयोग सुरेश जाखोटिया यांचा ३५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. सुयोग जाखोटिया

१. ‘कलियुगातील बहुतांश मुले आई-वडिलांना दुखवत असतांना सुयोग यांनी आपल्या आई-वडिलांची निस्वार्थ भावाने सेवा करणे

‘श्री. सुयोग यांची त्यांच्या आई-वडिलांप्रती पुष्कळ भक्ती आहे. ते ‘आपल्या आई-वडिलांची सेवा भावपूर्ण रितीने कशी करतात ?’, याची अनेक उदाहरणे मला पहायला मिळाली. कलियुगातील बहुतांश मुले आई-वडिलांना दुखवतात. अशा मुलांना ‘आपल्या माता-पित्याची काळजी कशी घ्यावी ?’, हे शिकायला मिळावे; म्हणून ‘सुयोग यांचा त्याग आणि ते निस्वार्थ भावाने करत असलेली आई-वडिलांची सेवा यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. सुयोग यांच्यातील ‘प्रेमभाव’ आणि ‘इतरांचा विचार कसा करायचा ?’, हे गुण मला अनेक प्रसंगांतून शिकायला मिळाले.

१ अ. आई-वडील आणि बहीण यांच्या प्रती आत्यंतिक जिव्हाळा असल्याने त्यांना अधिकाधिक आनंद देण्यासाठी सुयोग यांनी अखंड धडपड करणे : आई-वडील आणि लहान बहीण यांच्यावर सुयोग यांचे आत्यंतिक जिव्हाळ्याचे प्रेम आहे. ‘त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे आणि त्यांना अधिकाधिक आनंद देणे’, यांसाठी ते अखंड धडपड करतात. आईच्या आजारपणात ते आईची सर्व काळजी घेतात. आईच्या पायांना तेल लावून मर्दन करणे, जेवण वाढणे आदी सेवा ते मनापासून करतात. आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करतांना येणाऱ्या अडथळ्यांवर ते चिकाटीने मात करतात. आई-वडिलांवरील त्यांचे प्रेम आणि कृतज्ञताच त्यांच्याकडून आज्ञापालन करवून घेते.

आई-वडील आणि बहीण यांची सर्व काळजी घेत असूनही ‘आपण न्यून पडत आहोत’, अशी खंत वाटून त्यांना रडू येते. तेव्हा मला ते श्रावण बाळासारखेच भासतात.

१ आ. लहान बहिणीची सर्वतोपरी काळजी घेणे

१. सुयोग आई-वडिलांप्रमाणेच त्यांच्या लहान बहिणीची काळजी घेतात. तिच्या दोन्ही बाळंतपणात त्यांनी तिची पुष्कळ काळजी घेतली. रात्री बाळ झोपेतून रडत उठल्यास घरातील व्यक्तींची झोपमोड होऊ नये; म्हणून बाळाचे कपडे पालटणे, त्याला दुधाची बाटली देणे, खेळवणे, झोपवणे आदी सर्व ते करत असत.

२. बहीण माहेरपणाला आल्यावर तिचे आणि दोन्ही भाच्यांचे सगळे लाड पुरवून त्यांना आनंद देण्यासाठी ते आधीपासून नियोजन करतात.

१ इ. कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्याच्या कर्तव्यात न्यून पडायला नको; म्हणून सुयोग यांनी अधिक वेळ काम करणे : सुयोग यांना अंगदुखी, ‘मायग्रेन’ (तीव्र डोकेदुखी) आणि थकवा येणे, असे शारीरिक त्रास सतत होत असतात. आई-वडिलांना विश्रांती मिळावी, तसेच आईला सेवेसाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी घराचे सगळे दायित्व सुयोगनी स्वतःकडे घेतले आहे. कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्याच्या कर्तव्यात न्यून पडायला नको; म्हणून विश्रांती न घेता ते अधिक वेळ चित्रीकरणाचे काम करतात.

१ ई. लग्न झाल्यावर स्वतः फिरायला जाण्याऐवजी आई-वडिलांना यात्रेला पाठवणे : लग्न झाल्यावर प्रत्येकाला फिरायला जाण्याची हौस असते. आमच्या लग्नानंतर सासूबाईंना द्वारका आणि सोमनाथ यांची यात्रा करायची इच्छा होती. त्या वेळी बाहेरगावी जाण्याच्या स्वतःच्या इच्छेला सुयोग यांनी मुरड घातली आणि आई-वडिलांची यात्रेला जाण्याची इच्छा पूर्ण केली. यातून ‘ते स्वसुखाचा किती त्याग करतात ?’, हे लक्षात येते.

१ उ. आई-वडिलांना विचारून घरातील प्रत्येक निर्णय घेणे : सुयोग घरातील प्रत्येक निर्णय आई-वडिलांना विचारून घेतात. व्यवसायासाठी लागणाऱ्या तांत्रिक वस्तूंचा त्यांचा चांगला अभ्यास असल्याने एखादी वस्तू विकत घेण्याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात, तरीही आई-वडिलांना मान देण्यासाठी ते त्यांना विचारूनच वस्तूंची खरेदी करतात.

२. सुयोग यांच्यामध्ये असलेली शिकण्याची तळमळ आणि त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !

सुयोग सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते मला ‘भावस्थिती टिकवण्यासाठी काय करतेस ? स्वभावदोषांवर सूचना कशी बनवतेस ?’, असे प्रश्न विचारून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांची शिकण्याची गती एवढी जलद आहे की, इतरांचे प्रयत्न ऐकत असतांनाच त्यांचे स्वतःचे तसे प्रयत्न लगेच चालू होतात आणि ‘त्यातून काय जाणवले ?’, याविषयी ते सांगतात.

एकदा सुयोग यांचे कौतुक करतांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘सुयोगमध्ये शिकण्याची वृत्ती आहे. त्याने सेवेतील तांत्रिक गोष्टी चांगल्या प्रकारे शिकून घेतल्या आहेत.’’

३. पत्नीला समजून घेणारे आणि तिला निरपेक्षपणे साहाय्य करणारे सुयोग !

माझी प्राणशक्ती अल्प, म्हणजे ३३ टक्के असून ‘माझ्यावर वाईट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात’, असे एका संतांनी सांगितले आहे. त्यामुळे मी अधिक वेळ झोपूनच असते; पण याविषयी सुयोग यांचे कधीच गाऱ्हाणे नसते. मी रुग्णाईत असतांना ते मला निरपेक्षपणे साहाय्य करतात. त्रासामुळे माझे मनोबल उणावले असल्यास ते मला वेळोवेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रोत्साहनपर बोलण्याची आठवण करून देतात.

४. प्रारब्धाकडे साक्षीभावाने पहाणे

त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आणि दुःखे आली. त्या वेळी त्यांनी इतरांना दोष न देता ‘देवाने प्रारब्ध संपवले’, असा विचार करून त्या घटनांकडे साक्षीभावाने पहाण्याचा प्रयत्न केला. मला आध्यात्मिक त्रासामुळे तीव्र वेदना होत असतात. त्याकडे भावनिकदृष्ट्या न पहाता ते साक्षीभावाने पहातात.

५. आश्रमजीवन आणि साधना यांविषयी सुयोग यांच्या मनात असलेली ओढ !

सुयोग यांना रामनाथी आश्रम, परात्पर गुरु डॉक्टर, संत, साधक आणि तेथील सेवा यांची आठवण येते अन् त्यांच्या मनात आश्रमात परत जाण्याची ओढ निर्माण होऊन रडू येते. साधनेतील आनंद मिळाल्याने ते मायेतील पैसे मिळवण्याच्या कामांमध्ये रमू शकत नाहीत. गुरुसेवा, सत्संग आदींसाठी त्यांचे मन तळमळत असते; आपल्या आई-वडिलांचे दायित्व नीट पार पाडता यावे; म्हणून त्यांनी पूर्णवेळ साधना न करता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्णय घेतला. त्यांना पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा, आवड आणि तळमळ आहे.

‘पूर्णवेळ साधना करून गुरुचरणांशी जाण्यासाठी तळमळणाऱ्या सुयोग यांचा मार्ग लवकरात लवकर मोकळा होऊ दे’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– चरणसेविका,
गायत्री, पुणे (२४.२.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.