‘सनातन प्रभात’ नियतकालिक म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगमच !

१. गंगा म्हणजे कर्म !

श्री. अनिल पाटील

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ‘काळानुसार काय आणि कोणते कर्म करावे (कसे प्रवाही रहावे ?) ?’ याचे मार्गदर्शन करतात. गंगा जशी शंकराच्या जटेतून निघालेली चैतन्यमय प्रवाही शक्ती आहे, त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेव आणि संत यांचे मार्गदर्शनही चैतन्याने ओतप्रोत भरलेले अन् प्रवाही (काळानुसार), तसेच व्यक्त स्वरूपात आहे.

२. यमुना म्हणजे भक्ती !

श्रीकृष्णाने यमुनेवर प्रेम केले; कारण ती भक्तीमय आहे. त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेव (श्रीकृष्ण) साधकांवर अपार प्रेम करतात. ते नियतकालिकांतून ‘भक्ती कशी करावी ? प्रेमभाव कसा वाढवावा ?’ याविषयी मार्गदर्शन करतात. ही भक्ती अव्यक्त स्वरूपात असते. ती गंगेत, म्हणजे कर्मात (नियतकालिकातील चैतन्यात) मिसळली की, व्यक्त (कृतीशील) होते. त्यामुळे साधकांचे कर्म भक्तीमय होते.

३. सरस्वती म्हणजे ज्ञान !

ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ! आपले श्रीगुरु नियतकालिकांच्या माध्यमातून आपल्याला अमूल्य ज्ञानाचा ठेवा देतात. या ज्ञानसागरातील मोती वेचून त्यांचा भावार्थ (ज्ञान हे गुप्त आहे) लक्षात घेऊन आपली बुद्धी मेधाबुद्धी केली की, प्रगल्भता वाढते. असे गुप्तज्ञान अव्यक्त असते. साधकांची भक्ती गंगेला मिळते, म्हणजे कर्म भक्तीमय होते. म्हणून पुढे ते व्यक्त होते, म्हणजेच भक्तीमय कर्मातून ज्ञान प्रकट होते.

– श्री. अनिल पाटील, नाशिक (सप्टेंबर २०१९)