(म्हणे) ‘जे लोक शिस्तीचा भंग करतात, त्यांनाच आमचे रक्षक रोखण्याचा प्रयत्न करतात !’

भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांचे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या केल्या जाणार्‍या छळाविषयी स्पष्टीकरण !

रोखण्याच्या नावाखाली भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणे, त्यांना खाण्या-पिण्यास न देणे’, असे केले जात आहे, हे पोलिखा यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? – संपादक 

भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा

नवी देहली – युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा त्रास अल्प करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय विद्यार्थ्यांशी गैरवर्तणूक करण्यात आल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे.

जे लोक शिस्तीचा भंग करतात, त्यांनाच आमचे रक्षक रोखण्याचा प्रयत्न करतात. हा नियम प्रत्येकासाठीच लागू आहे. आम्ही वैयक्तिक कुणालाही लक्ष्य करत नाही, असे स्पष्टीकरण भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी दिले. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा पोलंड आणि रोमानिया येथील सीमेवर पोलीस अन् सैनिक यांच्याकडून छळ करण्यात येत असल्याविषयी पोलिखा यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.