गुरुपरंपरेची अपकीर्ती करण्याच्या षड्यंत्राला बळी पडू नका ! – धनंजय देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने विक्रोळी (मुंबई) येथे मातृ-पितृ दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

श्री. धनंजय देसाई

मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंना रणात हरवणे शक्य नसल्याने लॉड मेकॉलेपासून भारतातील गुरुपरंपरेची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र चालू झाले, ते अद्यापही चालूच आहे. कोट्यवधी जन्महिंदूंना कर्महिंदू करणारे पूज्य आसारामजी बापू यांच्या चारित्र्यावरही लांच्छन लावण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. या षड्यंत्राला बळी पडू नका, असे आवाहन हिंदु राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांनी केले. योग वेदांत सेवा समितीच्या वतीने विक्रोळी येथील संभाजी गोल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मातृ-पितृ पूजन कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दीपप्रज्वलन, गणेशवंदना, गुरूंची प्रार्थना करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी पूज्य आसारामजी बापू यांचे मार्गदर्शन चलचित्राद्वारे दाखवण्यात आले. या कार्यक्रमात पाल्यांनी स्वत:च्या माता-पितांचे पूजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनय मिश्रा यांनी केले. पूज्य आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने मागील १५ वर्षे हा उपक्रम राबवला जात असून याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘पूज्य आसारामजी बापू आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी केलेल्या महान कार्यामुळे आपला धर्म, संस्कृती टिकून आहे’, असे गौरवोद्गार या वेळी श्री. धनंजय देसाई यांनी काढले.

हिंदु राष्ट्र आणणे, हीच संताच्या चरणी कृतज्ञता ठरेल ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

लव्ह जिहाद, गोहत्या, ‘हलाल’ या सर्वांचा आपल्या अर्थव्यवस्थेत शिरकाव झाला आहे. यांसह ‘व्हॅलेंटाईन डे’ यांसारखे ‘डेज्’ साजरे केल्याने हिंदूंचे वैचारिक धर्मांतर वाढत  आहे. मातृ-पितृ दिवस साजरा करणे, हे ‘व्हॅलेंटाईन डे’ला उत्तर आहे. हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हेच एक उत्तर आहे. ‘हिंदु राष्ट्र आणल्यामुळे समाजऋण फेडता येईल. हीच सर्व संताच्या चरणी कृतज्ञताही असेल.