सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महाराष्ट्रात सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजविघातक निर्णयाचा सनातन संस्था जाहीर निषेध करते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी ‘मद्यपींची भूमी’ म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. हा निर्णय सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारा असून त्यामुळे तो त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.

सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. पंजाबमधील युवा पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा चित्रपटही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’ आणि ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. इथे मात्र वाईन सहजासहजी उपलब्ध करून आपण मद्य पिण्यास प्रोत्साहनच देत आहात.

२. आधीच राज्यातील महिला आणि बालके मद्यपी पती अन् वडील यांच्या अत्याचारांनी पीडित आहेत. या निर्णयामुळे हे अत्याचार वाढीस लागून त्याचे पाप सरकारच्याच माथी लागेल.

३. ‘अथर्ववेद’, ‘महाभारत’, ‘मनुस्मृति’ आदी अनेक धर्मग्रंथांत मद्यपान हे महापाप सांगितले आहे. त्याला प्रोत्साहन हेही महापापच ठरेल. त्यामुळे सरकारने हा समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्यावा.