साहित्यांतून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणी असतात ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी

नागपूर – साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर राजकारण्यांनी येऊ नये, ही भूमिका योग्य नाही. साहित्यांतून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणीही आहेत. एक दुसर्‍याशी आपला संबंधच असता कामा नये, ही गोष्ट योग्य होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यिकांचे कान टोचले. ते १४ जानेवारी या दिवशी विदर्भ साहित्य संघाचा ९९ वा वर्धापनदिन महोत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन पद्धतीने ते बोलत होते. राजकारण आणि समाजकारण यांसह प्रत्येक क्षेत्राचा संबंध साहित्यिकांशी आहे. प्रत्येकाने मर्यादा, दायित्व आणि कर्तव्य यांविषयी स्वतःची लक्ष्मणरेषा ठरवणे आवश्यक आहे. ती ठरवण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी माझ्यासह सर्वच राजकारणी निधीसंकलन करत होते. त्या वेळी तत्कालीन अध्यक्षांनी ‘संमेलनाच्या व्यासपिठावर राजकारणी नकोत’, असे वक्तव्य केले होते. तो त्यांचा अधिकार होता; पण चांगल्या साहित्यांमुळे राजकारणात गुणात्मक परिवर्तन होते. चांगल्या साहित्यांतून राजकारणालाही चांगली दिशा मिळू शकते. राजकारण, समाजकारण आणि तरुण पिढी यांना साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा महत्त्वाचा असतो. त्यामुळे साहित्य संघाने लोकांपर्यंत पोचवले पाहिजे.