हिंदु तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी रईस इब्राहिम शेख याच्यावर गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

  • सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटनेत २१ वर्षीय हिंदु तरुणीचा बळी !

  • सिन्नर पोलिसांनी आत्महत्येची दप्तरी नोंदच केली नाही !

  • रईस याला अटक होण्यासाठी आज सिन्नर येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा !

मुसलमान महिलांच्या अश्‍लील ‘अ‍ॅप’विषयी लोकप्रतिनिधी बोलतात आणि त्यावर तत्परतेने कारवाईही होते. ‘लव्ह जिहाद’च्या लक्षावधी प्रकरणांत हिंदु युवतींना आतापर्यंत फसवले जाऊनही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अद्यापही मूग गिळून गप्प आहेत आणि आरोपी धर्मांधांना शिक्षाही होत नाही ! – संपादक
सिन्नर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नाशिक, ६ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील सिन्नर गावातील शिवाजीनगर भागात रहाणार्‍या एका २१ वर्षीय तरुणीने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी आत्महत्या केली; मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असे पुढे येत आहे. ‘या आत्महत्येला धर्मांध रईस इब्राहिम शेख हा उत्तरदायी असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी’, अशी मागणी येथील भाजपसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना ५ जानेवारी या दिवशी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सिन्नर येथील तहसीलदार यांनाही हे निवेदन सादर करण्यात आले. (‘लव्ह जिहाद’ची घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना अटक होण्यासाठी हिंदूंना पोलिसांना निवेदन द्यावे लागते. घटनेचे गांभीर्य ओळखून  स्वतःहून रईस याच्यावर गुन्हा नोंद न करणारे पोलीस हिंदूंचे रक्षणकर्ते आहेत, असे हिंदूंना वाटत नाही ! यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रईस याला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत वैध मार्गाने लढा दिला पाहिजे ! – संपादक)

आज सिन्नर येथे मोर्चा !

या घटनेचा निषेध, तसेच धर्मांध रईस शेख याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद होऊन त्याला अटक होण्यासाठी ७ जानेवारी या दिवशी दुपारी १ वाजता सिन्नर येथील वावी वेस ते सिन्नर बसस्थानकापर्यंत भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. सिन्नर येथील शिवाजीनगर भागात तरुणी ही बहिणीसमवेत रहात होती. मागील मासात बहिणीचा विवाह झाला होता. रईस शेख हा नेहमी तरुणीला भेटण्यासाठी घरी येऊन तिला धमकावून तिच्यावर बलात्कार करत असे. परिसरातील लोकांनी रईसला समज दिल्यानंतरही तो तरुणीला भेटण्यासाठी वारंवार येत, तसेच त्याने तरुणीचे पैसेही वापरले. (यावरून रईस याची या परिसरात किती दहशत आहे, हे लक्षात येते. – संपादक) आत्महत्येच्या वेळी तरुणी गरोदर होती.

२. स्थानिक नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलीस ‘काही घडलेच नाही’, अशा अविर्भावात वागत होते. या घटनेची सिन्नर पोलिसांच्या दप्तरी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. (हिंदू सहिष्णु असल्यामुळे पोलीस हिंदूंवरील अन्यायाकडे कानाडोळा करतात, हेच सत्य आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे ! – संपादक)

३. तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी ३० डिसेंबर २०२१ या दिवशी सर्वत्र पसरली; मात्र या सर्व प्रकरणामध्ये आरोपी कोण आहे ? हे सर्वांच्या लक्षात येत असतांनाही आरोपीची साधी चौकशीही कुणी केली नाही.

४. रईस याने आजपर्यंत अशा प्रकारे इतरांची फसवणूक केल्याचे समजते. (रईस शेख याने अनेक गुन्हे केले असतील, तर तो समाजात मोकाट कसा फिरतो ? पोलिसांचा त्याच्यावर वरदहस्त आहे का ? – संपादक) त्यामुळे सिन्नर तालुक्यातील जनतेमध्ये या घटनेविषयी प्रचंड रोष आहे.

५. तरुणीवर बलात्कार करणार्‍या रईस शेख याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ आणि ३०२ अंतर्गत बलात्कार अन् हत्या असे गुन्हे नोंद करावेत, तसेच गुन्हेगारास फाशीची शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा.