वाईट हवामानामुळेच बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याचा निष्कर्ष

नवी देहली – देशाचे पहिले तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याविषयीची चौकशी पूर्ण झाली आहे. तिचा अहवाल लवकर समोर येणार आहे; मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ‘वाईट हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले’, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने तिचा अहवाल कायदा विभागाकडे पाठवला आहे. येत्या आठवड्यात हा अहवाल वायूदलप्रमुखांकडे सोपवला जाणार आहे.

१. या समितीने तिच्या निष्कर्षात ‘अपघात घडला त्या दिवशी कुन्नूर भागात दाट धुके होते. परिणामी दृष्यमानता अल्प होती. त्यातून हेलिकॉप्टर भरकटल्याने ही दुर्घटना घडली असावी’, असे म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.

२. तमिळनाडूतील कुन्नूर येथे ८ डिसेंबर या दिवशी भारतीय वायूदलाचे ‘एम्आय- १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळून तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व १४ जणांचा मृत्यू झाला होता.