पाकिस्तानी गुप्तचर संघटनांच्या साहाय्याने खलिस्तान समर्थकांची मुंबई, देहली यांसह भारतातील अन्य शहरांवर आक्रमण करण्याची योजना !

  • भारतीय गुप्तचर अधिकार्‍याचा खुलासा !

  • मुंबईत ‘अतीदक्षतेची’ चेतावणी !

भारताच्या मुळावर उठलेल्या खलिस्तानी आतंकवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – खलिस्तानचे समर्थक असलेले काही गट भारतातील मुख्य शहरांवर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आय्.एस्.आय्.’च्या संपर्कात आहेत, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झालेल्या या माहितीवरून मुंबईमध्ये अतीदक्षतेची चेतावणी (हाय अर्लट) देण्यात आली आहे. (अशी चेतावणी देणे वरवरची उपाययोजना झाली, तर खलिस्तानी आतंकवाद कायमस्वरूपी संपवणे ही कायमस्वरूपी उपाययोजना झाली ! – संपादक)

लुधियाना न्यायालयातील बाँबस्फोटांशी  संबंध असलेल्या ‘शीख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जी.) या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा सदस्य जसविंदरसिंह मुलतानी याला जर्मनी येथील पोलिसांनी पकडले. या वेळी मुलतानी याने मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्यात येणार असल्याची माहिती दिल्याचे म्हटले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्कतेची, तसेच संशयास्पद घडामोडींकडे लक्ष देण्याची सूचना देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी शीघ्र कृती दल आणि बाँबशोधक पथक यांनाही सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.