कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ? – संपादक

रायपूर (छत्तीसगड) – येथील धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कालीचरण महाराज खजुराहोपासून २५ किमी दूर बागेश्‍वर धाम येथील एका भाड्याच्या घरात रहात होते. रायपूर पोलिसांनी पहाटे ४ वाजता अटकेची कारवाई केली. संध्याकाळपर्यंत पोलीस कालीचरण महाराजांना घेऊन रायपूरमध्ये पोचतील.

काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी कालीचरण महाराजांना अटक केल्याने मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा संताप

आंतरराज्य नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

काँग्रेस सरकारने जर या प्रकरणात आंतरराज्य नियमांचे उल्लंघन केले असेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून योग्य कारवाई केली पाहिजे ! – संपादक

कालीचरण महाराज यांना अटक केल्याच्या प्रकरणी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकारने म्हटले आहे की, छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने मध्यप्रदेश पोलिसांना न कळवता कालीचरण महाराजांना अटक करून आंतरराज्य नियमांचे उल्लंघन केले आहे. मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालकांना छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी संवाद साधत अटकेच्या प्रक्रियेसंबंधी निषेध नोंदवण्यास सांगण्यात आले असून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेन बघेल यांनी ‘कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता कारवाई करण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘म. गांधी यांचा अपमान करणार्‍याला अटक केल्याविषयी आनंदी आहात कि दु:खी ?’, हे स्पष्ट करावे’, असे म्हटले आहे. (‘देहलीतील बाटला हाऊसमधील जिहादी आतंकवाद्यांना ठार केल्यावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी का रडल्या होत्या ?’, हे भूपेन बधेल यांनी आदी स्पष्ट केले पाहिजे ! ‘जिहादी आतंकवादी इशरत जहाँ हिला चकमकीत ठार केल्यावर काँग्रेसवाल्यांना दुःख का झाले ?’, हेही बघेल यांनी सांगायला हवे ! – संपादक)