श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) येथील श्री कनक कालीश्‍वर मंदिर प्रशासनाने पाडले !

सरकारी भूमीवर बांधल्याचा आरोप

सरकारीभूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी आणि अन्य अतिक्रमणे पाडण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवत का नाही ? हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्यावर दडपशाही करणारे नास्तिकतावादी तमिळनाडू सरकार हिंदुद्वेषीच होत ! – संपादक 

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) – येथील श्री कनक कालीश्‍वर मंदिर हे सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधले असल्याचा आरोप करत प्रशासनाने ते पाडले. ‘प्रशासनाने आम्हाला मंदिरातील मूर्ती बाहेर काढण्यासही वेळ दिला नाही. मंदिर पाडण्याची कोणतीही नोटीस न बजावता हे मंदिर पाडण्यात आले. तडजोडीसाठी भाविक जिल्हाधिकार्‍यांना भेटायला गेले असतांनाही महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी मंदिर पाडले. ‘गर्भगृह पाडणार नाही’, असे आश्‍वासन भाविकांना देऊनही अधिकार्‍यांनी तेही पाडले’, असे आरोप भाविकांनी केले. त्यामुळे भाविकांनी याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘तपोवनम् चॅरिटेबल ट्रस्ट’कडून हे मंदिर चालवण्यात येत होते.

ख्रिस्ती मिशनर्‍यांशी संगनमत करून संपूर्ण मंदिर पाडले ! – विश्‍वस्त आणि भक्त यांचा आरोप

या मंदिरातील गर्भगृह कायदेशीररित्या संपादित केलेल्या १५ टक्के भूमीवर बांधले होते, असे सांगण्यात येते. विश्‍वस्त आणि भक्त यांचा आरोप आहे की, या वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘केवळ कुंपणाची भिंत आणि अन्नदान सभागृह पाडू’, असे आश्‍वासन देऊन अधिकार्‍यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांशी संगनमत करून संपूर्ण मंदिरच पाडले. (या गंभीर आरोपाची तमिळनाडू सरकार नोंदही घेणार नाही. त्यामुळे याविषयी आता केंद्र सरकारनेच याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)