घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपने २६ नगरसेवक गोव्याला सहलीसाठी पाठवले !

  • नागपूर विधान परिषद निवडणूक कोणत्याही निवडणुकीपूर्वी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार आणि खासदार हे फुटू नयेत, यासाठी त्यांना विविध राज्यांत सहलीसाठी पाठवले जाते, तसेच तेथे त्या सर्वांना पंचतारांकित उपाहारगृहांत व्यवस्था करून कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. अशा पद्धतीने घेतलेल्या निवडणुकीतून जनतेचे कधीतरी भले होईल का ? हिंदु राष्ट्रात अशा स्वरूपाच्या निवडणुका नसतील. – संपादक 
  • घोडेबाजार रोखण्यासाठी सहलीला पाठवावे लागणे, हे लोकराज्याचे अपयश ! – संपादक
भाजपाची रणनीती- २६ नगरसेवक गोव्याला सहलीसाठी पाठवले

नागपूर – नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी भाजपकडून काळजी घेतली जात आहे. भाजपने स्वतःच्या २६ नगरसेवकांना सहलीसाठी २९ नोव्हेंबरच्या रात्री १ वाजता विमानाने गोवा येथे रवाना केले आहे, तर उर्वरित नगरसेवक विविध ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर महापालिकेत भाजपचे १०८ नगरसेवक असून पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे मतांविषयी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष यांपेक्षा भाजपचे पारडे जड आहे. दुसरीकडे काँग्रेसलाही स्वतःचे नगरसेवक पळवण्याची भीती असल्याने काँग्रेसनेही रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. या निवडणुकीत ५५६ मतदार असून सध्या ६० मतांनी भाजपचे पारडे जड आहे. ‘निवडणूक लढवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते आम्ही करू. आम्ही ४०० हून अधिक मतांनी ही निवडणूक जिंकू’, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केला आहे.