मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग न्यून होऊ लागल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
राजेश टोपे म्हणाले की,…
१. सार्वजनिक आरोग्य विभागाने पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे. २५ नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय होणार आहे.
२. सध्या विवाह समारंभात गर्दी वाढत आहे. तेथे सामाजिक अंतर पाळले जात नाही. बिनधास्तपणा जाणवत आहे. ही मानसिकता घातक आहे. सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. दुसर्या लाटेत आपली हानी झाली आहे.
३. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे यांना आता ५० टक्के अनुमती दिली आहे. ही परिस्थिती सुधारली, तर निर्बंधांविषयी सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील.
४. राज्यात आता ८०० रुग्ण सापडत आहेत. यामध्ये बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
५. लस देऊन एक वर्ष झाले आहेत, अशांना ‘बूस्टर डोस’ देण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.