टाळंबा धरण प्रकल्प रहित करण्याची शेतकर्‍यांची मागणी

 जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले निवेदन

कुडाळ – तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील टाळंबा धरण प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. प्रारंभी ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता अंदाजे खर्च ६ ते ७ सहस्र कोटी रुपयांच्याही पुढे गेला आहे. हा प्रकल्प होण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे हा प्रकल्प रहित करावा, अशी मागणी टाळंबा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समिती आणि धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येऊन गेले. या वेळी टाळंबा धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे त्यांची भेट देऊन मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, धरणाच्या लाभ क्षेत्रातील भूमीचे दर आता प्रति गुंठा १ लाखाहून अधिक झाले आहेत. बुडीत क्षेत्रातील केवळ धरण रेषेवरील गावांचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित ५ गावे, तसेच २ कालवे यांच्यासाठी लागणार्‍या भूमीचे संपादन झालेले नाही. लाभ क्षेत्रातील पूररेषा निश्‍चित केलेली नाही. भूमीचे दर वाढल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी त्यांच्याकडील भूमी पुनर्वसनासाठी द्यायला सिद्ध नाहीत.

जलसंपदामंत्री पाटील यांनी त्यांच्या दौर्‍यात, ‘जिल्ह्यातील टाळंबा धरणासह ९ धरणांचे काम लवकरच चालू करण्यात येणार आहे’, असे वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांच्या मागणीला विशेष महत्त्व आहे. (शेतकर्‍यांची समस्या जाणून न घेता मंत्री धरणाचे काम चालू करण्याची घोषणा कशी काय करतात ? – संपादक)