राज्यघटना ‘सेक्युलर’ (निधर्मी) असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीवर ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमांतर्गत ‘गणेशोत्सवामध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करण्याचा संकल्प’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

श्री. रमेश शिंदे

पुणे – प्रत्येक कुटुंबाने श्री गणेशाला ‘हिंदु राष्ट्र’ आणण्यासाठी संकल्प करायला हवा. ही आपली समष्टी साधनाच आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यानंतर हिंदूंच्या समस्यांचे संपूर्ण निराकरण होईल. अल्पसंख्यांकांना अधिकार देण्यासाठी राज्यघटनेत अनुच्छेद २६ ते ३० समाविष्ट करण्यात आले असून त्यात अल्पसंख्यांकांना धर्माचे शिक्षण देणे, धर्माचा प्रसार-प्रचार करणे, तसेच सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळवणे, अशा प्रकारच्या सवलती देण्यात आल्या. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला जातो ? भारतात एकतर अल्पसंख्यांकांना ठेवायचे असेल, तर राज्यघटना ‘सेक्युलर’ नसेल आणि राज्यघटना ‘सेक्युलर’ असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात; कारण त्या घटनाविरोधी आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. सुरेश चव्हाणके

‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘गणेशोत्सवामध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करण्याचा संकल्प’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र घेण्यात आले. त्या वेळी श्री. रमेश शिंदे बोलत होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. या कार्यक्रमात राज्यघटना विशेषज्ञ डी.के. दुबे यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.

श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. ‘जे.एन्.यू.’मध्ये हिंदूंना आतंकवादी म्हटले जाते. वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीतून हिंदूंना आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात येऊन मुसलमान, ख्रिस्ती, इंग्रज यांनी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महिलांवर अत्याचार केले आणि त्यांना गुलाम बनवले; मात्र हिंदूंनी कोणत्याही संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हिंदु धर्माविषयी दिल्या जाणार्‍या भ्रामक माहितीला आपण विरोध केला पाहिजे. जेव्हा धर्माची स्थापना करण्यास देव अवतार घेतो, तेव्हा आपण आपली मानसिकता संकुचित का ठेवत आहोत?

२. इस्लाम वाढतो तेव्हा जिहादही वाढतो. हिंदुस्थानातून पाक आणि बांगलादेश निर्माण झाले. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये इस्लाम वाढला, तेव्हा एका रात्रीत हिंदू निष्कासित झाले. सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी. आपले सण, उत्सव, मंदिरे, परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.

राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ शब्द काढून ‘हिंदु’ शब्दाचा समावेश करायला हवा ! – डी.के. दुबे, राज्यघटना विशेषज्ञ

डी.के. दुबे

प्रा. के.टी. शहा यांनी १५ नोव्हेंबर १९४८ मध्ये राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ शब्द वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा ‘भारत-पाक विभाजन झाल्यानंतर भारत हा एका धर्माचाच देश आहे. भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. घटनेच्या प्रस्तावनेत ‘सेक्युलर’ शब्द घेता येणार नाही. हा शब्द भ्रामक आहे’, असा निर्णय घेण्यात आला होता. (त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या वेळी राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ हा शब्द घातला.) त्याच वेळी राज्यघटनेमध्ये ‘हिंदु’ या शब्दाचा समावेश करायला हवा होता, तो केला गेला नाही. घटनाकारांच्या म्हणण्यानुसार भारत हे ‘हिंदु राष्ट्रच’ आहे. आता संसदेत विधेयक आणून राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ शब्द काढून ‘हिंदु’ शब्दाचा समावेश करायला हवा. ‘हिंदु’ या शब्दाची परिभाषा निश्चित करायला हवी.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यानंतर तुष्टीकरणाचे राजकारण संपेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, ‘भाषेच्या आधारावर कोणतीही व्यक्ती एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाईल, तेव्हा ती अल्पसंख्यांक होईल’, अशी अल्पसंख्यांकांची व्याख्या होती. भारतात धर्माच्या नावावर अल्पसंख्यांकाच्या व्याख्येची आवश्यकता नाही.