हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंततः ‘रावण लीला’ या चित्रपटाचे नाव पालटले !

हिंदुत्वनिष्ठांनी सनदशीर मार्गाने दिलेल्या लढ्याला यश !

  • हिंदू जागृत झाल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदूंनो, चित्रपटातील प्रभु रामचंद्रांचा अवमान करणारे संवाद आणि दृश्ये पूर्णतः पालटली जाईपर्यंत वैध मार्गाने लढा चालूच ठेवा ! – संपादक 
  • यापुढे कुणीही असे चित्रपट निर्माण करण्याचे धाडस करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे अपेक्षित ! – संपादक 

ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीरामांविषयी अपसमज पसरवून रावणाचे उदात्तीकरण केल्याच्या प्रकरणी ‘रावण लीला’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना अंबरनाथ येथील धर्मप्रेमी श्री. कमलेश गुप्ता यांनी १३ सप्टेंबरला अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांच्या माध्यमातून नोटीस पाठवली होती. ‘या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवाद काढून विनाअट क्षमा मागावी’, अशी मागणीही श्री. गुप्ता यांनी केली होती. हिंदुत्वनिष्ठांनीही या चित्रपटास सामाजिक माध्यमांद्वारे विरोध दर्शवला होता. अंततः या चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे देण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरुण आदर्श यांनी सामाजिक माध्यमाद्वारे ही माहिती दिली. ‘प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करून आम्ही ‘रावण लीला’ चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे करत आहोत’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी घोषित केले.

चित्रपटातील संवाद अन् कथानक यांत पालट केला नसेल, तर आम्ही पुढील कारवाई करू ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

याविषयी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर म्हणाले, ‘‘हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या ‘रावण लीला’ चित्रपटाचे नाव पालटले असले आणि संवाद आणि कथानक यांत दुरुस्ती केलेली नसेल, तर आम्ही संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करू. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) असतांनाही हिंदूंच्या देवतांचे विडंबन किंवा त्यांचा अवमान होईल, असे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मग हे मंडळ नेमके काय काम करत आहे ? असा प्रश्न पडतो. ‘असे चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत, यासाठी परिनिरीक्षण मंडळाने कठोर पावले उचलावीत’, अशा आशयाचे पत्र मंडळाला आम्ही देणार आहोत.’’