‘हरितालिका व्रता’चे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व

९ सप्टेंबर २०२१ या दिवशी ‘हरितालिका तृतीया’ आहे. त्या निमित्ताने…

‘पार्वतीने ‘भगवान शिवाची वर रूपाने प्राप्ती व्हावी’, म्हणून हरितालिका व्रत केले होते. ‘सुयोग्य पती मिळावा’, यासाठी कुमारिका आणि ‘मिळालेले सौभाग्य अखंड रहावे’, यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामध्ये महेश्वर, म्हणजे भगवान शिव आणि उमा, म्हणजे पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे यथाशक्ती पूजन करतात. या दिवशी हरितालिकेचे पूजन करण्यासमवेतच स्त्रिया दिवसभर उपवास करतात. तसेच पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला दिवा पूजेच्या विसर्जनापर्यंत, म्हणजे दुसर्‍या दिवसापर्यंत अखंड तेवत ठेवतात. असे केल्याने पूजकाला त्याच्या भावानुसार शिवतत्त्व आणि तेजतत्त्व यांचा लाभ होतो. या दिवशी स्त्रिया जीवनात येणारी विघ्ने दूर करण्यासाठी शिवाला प्रार्थना करतात. भावपूर्ण प्रार्थनेमुळे स्त्रीकडे शिव-शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो आणि याचा स्त्रीच्या भावानुसार तिला लाभ होतो.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)