बहीण-भावाचा उत्कर्ष करणारे रक्षाबंधन !

१. इतिहास

अ. ‘पाताळातील बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.’

आ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहास काळापासून चालू झाली.

२. भावनिक महत्त्व

राखी बहिणीने भावाच्या उजव्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.

३. राखी बांधणे

तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात् राखी सिद्ध होते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ॥

अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

४. प्रार्थना करणे

बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यासमवेतच दोघांनीही ‘राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.

५. राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा !

सध्या राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एक प्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते अन् यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)