इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या निकालावरच पदवीधर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया होईल ! – उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री

मुंबई – इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या निकालावरच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमांतील प्रवेशप्रक्रिया होईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या वर्षी राज्याचा इयत्ता १२ वीचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागल्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेसाठी प्रवेश देणे सोपे व्हावे, यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल, अशी चर्चा सामाजिक माध्यमांवर करण्यात आली; मात्र अशा प्रकारची कोणतीही परीक्षा होणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

याविषयी उदय सामंत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तुकड्या किंवा विद्यार्थी यांची आवश्यकता असेल, तर ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठवावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाणार नाही, याची दक्षता विद्यापिठाने घ्यायला हवी, अशी सूचना देण्यात आली आहे.’’