कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन झाले असून यात पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे. यामध्ये ५६४ हेक्टर शेतभूमी, तर ६२५ हेक्टर बिगरशेती असणार्‍या भूमीची हानी झाली आहे. साधारणत: साडेदहा सहस्र शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. यामुळे शेतीची मोठी हानी झाली असून याची गंभीर नोंद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, ‘‘सध्या भूस्खलन झालेल्याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर चालू आहे. अद्यापही पंचनामे चालू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.’’